जिद्द, कष्ट, प्रामाणिकपणा, सौजन्य आणि ग्राहकसेवा या पंचसूत्रीमुळे मला व्यवसायात उत्तुंग यश : मसालाकिंग डॉ. धनंजय दातार
मुंबई– “दुबईमध्ये ३८ वर्षांपूर्वी वडिलांनी थाटलेल्या लहानशा किराणा दुकानात मदत करायला मी भारतातून आलो तेव्हा माझ्या खिशात १० दिऱ्हॅमच्या केवळ ३ नोटा होत्या. या कर्मभूमीने माझी खडतर परीक्षा घेतली आणि त्या कसोटीला उतरताच भरभरुन देऊही केले. जिद्द, कष्ट, प्रामाणिकपणा, सौजन्य व ग्राहकसेवा या पंचसूत्रीमुळेच मला व्यवसायात उत्तुंग यश लाभले आणि एका सामान्य दुकानदारापासून ते मसालाकिंग बनण्यापर्यंत माझा प्रवास झाला.”, असे प्रतिपादन अल अदील या जागतिक समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी नुकतेच दुबईत केले.
डॉ. दातार आणि त्यांच्या अल अदील या समूहाच्या ३८ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून दुबईतील ॲड्रेस हॉटेलमध्ये एका शानदार समारंभाचे आयोजन करण्यात आले. डॉ. दातार यांनी लिहिलेल्या मसालाकिंग – ए जर्नी ऑफ मेमॉयर्स या इंग्रजी आत्मचरित्राचे प्रकाशनही यावेळी प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते व केंद्रीय समाजकल्याण मंत्री मा. रामदास आठवले यांच्या उपस्थितीत झाले. या कार्यक्रमात डॉ. दातार बोलत होते. याप्रसंगी डॉ. धनंजय यांच्या पत्नी सौ. वंदना, पुत्र हृषिकेश आणि रोहित यांसह दुबईतील विविध क्षेत्रांतील मान्यवर, ‘अल अदील’चा कर्मचारीवर्ग व ग्राहक उपस्थित होते. सुरेश वाडकर यांच्या मधुर गीतांनी सजलेला हा कार्यक्रम दुबईकरांसाठी अविस्मरणीय ठरला.
आत्मचरित्राच्या निमित्ताने डॉ. दातार यांनी आजवरच्या प्रवासातील स्मरणीय आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, “ माझे बालपण गरीबीत गेले. मला शालेय अभ्यासात गती नव्हती. माझ्या अंगात कौशल्य नव्हते. इयत्ता दहावीला मी गणितात पाच वेळा नापास झालो. परंतु खटपट्या स्वभावामुळे मला विक्रीची आवड होती. शाळेत असताना फावल्या वेळात मी रस्त्यावर उभे राहून चिंचा-बोरे विकायचो आणि पुढे महाविद्यालयीन जीवनात कॉलेज सांभाळून मुंबईच्या उपनगरांत फिनेल, इन्स्टंट मिक्स अशी उत्पादने दारोदार विकली. आमच्या घराण्यात तोवर कुणीच व्यवसायाच्या वाटेला गेले नव्हते. माझ्या वडिलांनीही आयुष्यभर विविध नोकऱ्या केल्या. मात्र अखेरच्या नोकरीत दुबईतील कंपनीतून निवृत्त होण्याच्या उंबरठ्यावर त्यांना व्यवसायाची संधी दिसली. दुबईत कामानिमित्त गेलेल्या भारतीयांना त्यांच्या रोजच्या खाण्यातील पिठे, मसाले, लोणची, चटण्या तेथे सहज मिळत नाहीत हे लक्षात येताच त्यांनी एक लहानसे दुकान उघडले. बाबांची भागीदारीत फसवणूक झाल्याने त्यांना मदत करण्यासाठी मी प्रथम दुबईला गेलो आणि अशा रीतीने योगायोगाने उद्योजकता माझ्या आयुष्यात आली.”
ते पुढे म्हणाले, “व्यावसायिक कारकीर्दीच्या सुरवातीला पहिल्याच वर्षी फेरविक्रेत्यांनी उधारी थकवल्याने आम्ही नुकसानीत गेलो, परंतु माझ्या आईने सोन्याच्या मंगळसूत्रासह सर्व दागिने व घरातील फर्निचरही विकून आम्हाला पैसे पाठवले. सोबतच्या चिठ्ठीत लिहिले होते, की ‘एकदा पुढे टाकलेले पाऊल मागे घेऊ नका.’ त्या शब्दांनी माझ्यात जिद्द जागवली. साडेतीन वर्षे अविरत कष्ट करुन, काटकसरीने राहून अखेर आम्ही दुकान नफ्यात आणले. आईचे सर्व दागिने पुन्हा घडवून तिला दिल्यावर तिच्या नजरेतील कौतुक हे माझे सगळ्यात मोठे बक्षीस होते. मी नम्र राहून व मैत्री करुन खूप माणसे जोडली. विविध समाजांतील लहान व्यावसायिकांनी मला व्यवसायातील खाचा-खोचा व कानमंत्र शिकवले. आयुष्यात कोणतेही काम छोटे-मोठे नसते व आपले पूर्वग्रह धंद्यात आणून चालत नाही, हा मोलाचा उपदेश मला एका जैन व्यापाऱ्याने केला तर कष्ट आणि कौशल्य कधीही वाया जात नाही, ही शिकवण मला मुल्लाचाचा नामक व्यापाऱ्याने दिली. मी सतत नवे शिकत गेलो. सुरवातीला व्यवसायात नवशिका असताना माझी फसवणूक झाली आणि धंदा करणे हे तुम्हा मराठी लोकांचे काम नाही, असा अपमानही सहन करावा लागला, परंतु मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित केले. कष्ट, सातत्य, संयम यामुळे मी व्यवसाय विस्ताराच्या संधीही साधल्या. पहिली एक-दोन दुकाने बँकेच्या कर्जावर सुरू केली, परंतु एका हॉटेल व्यावसायिकाने मला दैनंदिन बचत करुन त्या गंगाजळीच्या आधारावर व्यवसाय कसा वाढवायचा ते शिकवले. त्यामुळे मी आखाती देशांमध्ये आजवर ५० सुपर स्टोअर्सची साखळी विणू शकलो.”
“व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर सुरक्षित, शुद्ध व भेसळमुक्त उत्पादने तसेच सौजन्यपूर्ण सेवा देऊन ग्राहकांना काटेकोर जपावे कारण अखेर तेच आपल्याला नाव व कीर्ती मिळवून देतात. मला दुबईच्या शासकांनी ‘मसालाकिंग’ हा बहुमान देऊन गौरवले यामागे माझे कर्मचारी, ग्राहक यांचा विश्वास कारणीभूत आहे. यश व समृद्धीचे स्वप्न बघणाऱ्या भारतीय सर्वसामान्य तरुणांमधून हजारो उद्योजक निर्माण व्हावेत हे माझे स्वप्न आहे. अशा नवउद्योजकांना प्रेरणा मिळावी म्हणून मी हे आत्मचरित्र लिहिले आहे,”, या शब्दांत डॉ. दातार यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.