विद्यार्थ्यांनो भविष्यातील आव्हाने ओळखा : सुनील माने
पुणे : येणारा काळ हा अतिशय वेगळ्या क्षेत्रांचा आणि आधुनिक असणार आहे. भविष्यातील आव्हाने ओळखून विद्यार्थ्यांनी स्वत:ला तयार केले पाहिजे. असे मत भाजप पुणे शहर चिटणीस तसेच शाळेचे माजी विद्यार्थी सुनील माने यांनी व्यक्त केले.
रेंजहिल्स सेकंडरी स्कूल मधील शालांत परीक्षेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ओ.एफ.ई.इ सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यामार्फत आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
शाळेचे खजिनदार शैलेंद्र जगताप यांनी या कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते. या कार्यक्रमाला खडकी ॲम्युनेशन फॅक्टरीचे अतिरिक्त महाव्यवस्थापक के. के.मोर्या, संचालक विश्वास शेलार, जीवन गोरसे, संजय गायकवाड, संतोष घोडके, विशाल शेलार, सचिव श्रीनाथ कांबळे, वसुंधरा राज निरभवणे, प्रकाश दास, वैशाली पैलवान, विशाखा जगताप, विद्या देठे यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक रामदास जगताप, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह १९७४ पासूनचे आजी माजी विद्यार्थी तसेच अन्य मान्यवर ही उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील अव्हानांविषयी अवगत करताना सुनील माने म्हणाले, विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांकडून अथवा शिक्षकांकडून याबाबत योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. आजवर एकावेळी एक विषय घेऊन पदवी प्राप्त करता येत होती. मात्र आता केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कायद्यामुळे एकापेक्षा अधिक विषयाची परीक्षा देऊन पदवी मिळवणे सहज शक्य झाले आहे. आज दहावी झालेले विद्यार्थी पदवी प्राप्त करू पर्यंत सात वर्षाचा कालावधी जाणार आहे. यावेळी नोकरीची संधी सहज उपलब्ध होणार नाही. तसेच व्यवसायाची निवड करतानाही काळजीपूर्वक करावी लागणार आहे. विदार्थ्यानी शिक्षक अथवा पालकांवर अवलंबून न राहता ज्ञानार्जनासाठी माहितीचा अचूक वापर केला पाहिजे. सध्या स्पर्धा परीक्षे विषयी मार्गदर्शन करणाऱ्या क्लासचे पेव फुटले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक स्पर्धा परीक्षेकडे वळावे. परिस्थिती समोर हतबल न होता यशस्वी होण्यासाठी विविध क्षेत्रांचा विचार करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.
के. के.मोर्या यांनी अब्राहम लिंकन तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाचे उदाहरण देत आयुष्यात यशस्वी होण्यासाठी खडतर परिश्रम घेण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. शाळेचे मुख्याध्यापक रामदास जगताप यांनी शाळा सध्या कठीण परिस्थितून जात असल्याने माजी विद्यार्थ्यांनी शाळेला मदत करण्याचे आवाहन केले. शाळेच्या शिक्षिका प्रमिला नारायणे यांनी या कार्याक्रमाचे सूत्रसंचालन केले.
