राज्यात मध्यवधी निवडणूकाची शक्यता – शरद पवार
मुंबई : महाराष्ट्रात सत्तेवर आलेले नवीन सरकार सहा महिन्यांत कोसळू शकते. त्यामुळे राज्यात विधानसभेची मध्यावधी निवडणूक लागण्याची शक्यता असून आतापासूनच तयारीला लागा, अशी सूचना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे सरकारची सोमवारी विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे त्यांनी आमदारांना मार्गदर्शन केले.
शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रातील नव सरकार, शिंदे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. हे सरकार पाच ते सहा महिने टिकेल. त्यामुळे मध्यवर्ती निवडणुकांसाठी तयार राहा. तसेच विरोधी बाकावर बसणार असलो तरी मतदार संघात जास्तीत जास्त वेळ द्या. शिंदे सरकारमध्ये नाराजांची फौज मोठी आहे.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही नाराजी उघड होताना पाहायला मिळेल. त्यामुळे बंडखोर आमदार स्वगृही परतण्याची शक्यता आहे. सरकार पडलं तर मध्यावधी निवडणुका लागतील. त्यामुळे तयारी आत्तापासून करायला लागा, असे त्यांनी सांगितले.
