भाजपकडून शिवसेना संपवण्याचा डाव – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : “शिवसेनेत गद्दार नकोत. पक्षानी उमेदवारी दिलेल्या लोकांनीच गद्दारी केली. रक्ताचं पाणी करुन या लोकांनी निवडून दिली. आपल्या लोकांनी पाठीत खंजीर खुपसला”, भाजपकडून शिवसेना संपवण्याचा डाव आखला जात असल्याचा थेट आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री केला. राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांशी पुन्हा एकदा ऑनलाईन कॉनफरन्सिंगद्वारे संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.
शिवसेनेत गद्दार नकोत असे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, असं चित्र दाखवलं जात आहे की शिवसेनेत आता कोण राहिलं नाहीए, गेल्या महिन्यात आपल्या ज्या सभा झाल्या मुंबईची आणि संभाजीनगरची सभा,आता पावसाळा सुरु झाला आहे मी काही सोडणार नाही तुमच्या साथीने महाराष्ट्रभर सभा घेणार आहे. त्यासाठी आता मी सज्ज झालो आहे, त्यामुळे ती चिंता करण्याचा गरज नाही.
शिवसेना ही मर्दांची सेना आहे. ज्यावेळेस आपल्यासमोर कठिण प्रसंग आलेले आहेत, ज्यांनी आपल्याला आव्हानं दिली, त्या पोकळ आव्हानवीरांना राजकारणामध्ये संपवून आपण पुढे जात आलो आहोत. आताचा प्रसंग थोडा वेगळा आहे, शिवसेनेच्या वर्दापन दिनी मी म्हटलं होतं गद्दार आपल्यात नको आहेत. गद्दारांची औलाद पुन्हा समोर आली आहे.
तीन पक्षांचं सरकार आहे. सगळ्यांनी सांगतिलं होतं, काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर जात आहात ते तुम्हाला दगा देतील, त्यांच्या बाटलीवर तसं लेबलचं आहे, ते लेबल बघून वीषप्राशन आम्ही करतो आहोत.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपल्यासोबत राहणार हे त्यांनी जाहीर केलंय, पण पाठित खंजीर कोणी खुपसला तर आपल्याच लोकांनी. आता ही आपली लोकं तुम्ही सगळ्यांनी रक्ताचं पाणी करुन निवडून दिलेली आहेत. तुम्ही निवडून दिलेली ही लोकं नाराज होऊन गेले आहेत. तुमचा हक्क असतानाही तुम्हाला उमेदवारी देता आली नाही तरीही नाराज न होता आज कठिण प्रसंगी निष्ठेने एकत्र राहिलेले आहात, तुमचे आभार मी कोणत्या शब्दात मानू, याला म्हणतात निष्ठा.
