अडीच वर्षापासून आमदारांच्या मनात खदखद; माझ्यासोबत ४० आमदार – एकनाथ शिंदे
मुंबई : आम्हाला विकासाचं राजकारण करायचं आहे. कुणावरही व्यक्तिगत टीका करायची नाही. आम्ही ती करणारही नाही. आम्ही कट्टर शिवसैनिक होतो, आहे आणि राहणार आहे. धर्मवीर आनंद दिघे आमच्यासाठी दैवत आहेत. त्यांना बाळासाहेबांनी हिंदुत्वाचे विचार दिले. तेच आम्हाला पुढे मिळाले. तसेच अडीच वर्षापासून आमदारांच्या मनात खदखद होती, अशी प्रतिक्रिया राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
सोमवारी रात्री गुजरातच्या सुरतमध्ये ३५ आमदारांसह दाखल झालेले एकनाथ शिंदे समर्थक आमदारांना मध्यरात्री विशेष विमानाने आसामला नेण्यात आले. बुधवारी सकाळी गुवाहाटी विमानतळावर उतरताच दोन वेगवेगळ्या बसमधून शिंदे यांच्यासह आमदारांना नेण्यात आले.
विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी, “माझ्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार असून शिवसेना प्रमुखांचे हिंदुत्व मी पुढे घेऊन जाणार, गर्व से कहो हम हिंदु है,” असा नाराही त्यावेळी देण्यात आला.
पुढे ते म्हणाले की, काल जो गटनेता निवडला गेला तो गटनेता नियमबाह्य निवडला गेला. कारण सर्व आमदारांची निवड पद्धती ही बहुमताने निवडण्याची आहे. परंतु बहुमताचा आकडा आमच्यासोबत असल्यामुळे मला वाटतं की, त्यांनी ज्याप्रकारे निवड केली ही अवैध पद्धतीने करण्यात आली आहे. मागील अडीच वर्षांपासून आमदारांच्या मनात खदखद आणि रोष होता. त्यामध्ये अनेक प्रकारचे मुद्दे आहेत. ही आमदार ३ ते ४ लोकांमधून निवडून आलेले आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी सद्सदविवेक बुद्धीला धरून निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे जे काही आमदार आहेत. ते हिंदुत्वाचे मुद्दे, मतदार संघातील मुद्दे आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्वावरील मुद्दे असतील, ही या नेत्यांची विचारधारा आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदेंसोबत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील शिवसेनेचे आमदार आहेत. तसेच शिवसेना पुरस्कृत प्रहार पक्षाचे आमदार आणि राज्यमंत्री बच्चू कडू आणि राजकुमार पटेलही आहेत.