Wednesday, June 3, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

….तर काँग्रेसचा शरद पवारांना पाठिंबा – नाना पटोले

मुंबई-शरद पवारांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे उमेदवार जाहीर केले, तर काँग्रेस पवारांच्या नावाला पाठिंबा देणार असल्याचे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. महाराष्ट्राची व्यक्ती देशाची राष्ट्रपती होत असेल तर याचा मला आनंदच होईल. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेत्यांसह बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांची मोट बांधण्याची तयारी तृणमृल काँग्रेसकडून सुरू आहे.

भाजपकडून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली असून, विरोधकांनीही आपली मोट बांधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. या अनुषंगाने ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय राजकारणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. 15 जून रोजी बिगर भाजपशासित राज्याच्या मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेत्यांची एक बैठक दिल्लीत आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत राष्ट्रपती पदासाठी जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना उमेदवारी देणार असतील तर काँग्रेसचा पवारांना पाठिंबा असल्याचे मत काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.

बॅनर्जी यांनी बैठकीसाठी शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केरळचे पिनाराई विजयन, ओडिशाचे नवीन पटनायक, तेलंगणाचे के. चंद्रशेखर राव, तामिळनाडूचे एमके स्टॅलिन, झारखंडचे हेमंत सोरेन, पंजाबचे भगवंत मान आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसह 22 प्रमुख नेत्यांना पत्र पाठवले आहे. आता या बैठकीत काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपचा पराभव केल्यानंतर ममता बॅनर्जी राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाल्या होत्या, तेव्हाही त्यांनी बिगर भाजप शासित राज्यातील नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या, यानंतर त्यांनी उत्तर भारतातील अनेक राज्यात त्यांनी आपले भाषण दाखविण्यासाठी स्क्रीन लावत राष्ट्रीय राजकारणात आपण सक्रिय होत असल्याचे संकेत दिले होते. यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीत आपले उमेदवार पंतप्रधानांविरोधात निवडणूक लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती.

आता त्यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आग्रही भुमिका घेतली असली तरी त्यांना किती पाठिंबा मिळणार आणि काँग्रेस तृणमूल काँग्रेसला पाठिंबा देणार का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. याआधी ममता बॅनर्जी यांनी बैठकी आयोजित केल्या होत्या त्यांना सोनिया गांधी हजर नसल्याने या पुढेही काँग्रेसची भूमका काय असणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading