Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

वीरमाता आणि वीरपत्नी हे बलिदानाचे मूर्तिमंत उदाहरण – कर्नल प्रणय पवार

पुणे : देशात राहून देशासाठी काम करणारे अनेकजण आहेत. परंतु, देशासाठी प्राणाची आहुती जवान देत असतात. त्यांचे कुटुंबीय देखील देशासाठी त्यांचे प्राण अर्पण करण्याकरिता त्यांच्या मागे ठाम उभे राहतात, त्यामुळे त्यांचे बलिदान हे सर्वात मोठे आहे. बलिदानाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वीर माता व वीरा पत्नी आहेत. जवानांसाठी काही करायचे असेल तर त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे रहा, असे मत कर्नल प्रणय पवार यांनी व्यक्त केले.

भारत माता महिला मंडळ ट्रस्ट पुणे व इंडियन आर्मी आयोजित ‘अतूट बंधन – वीर नारी सन्मान’ सोहळ्याचे आयोजन पर्वती पायथ्या जवळील भारतमाता अभ्यासिकेच्या प्रांगणात करण्यात आले. कार्यक्रमात वीरमाता आणि वीरपत्नी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपा पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे श्रीकांत कारेगावकर, आयोजिका प्रियांका शेंडगे शिंदे, माजी महापौर सरस्वती शेंडगे, राजाभाऊ शेंडगे, कालिदास शिंदे, राजाभाऊ तुंगतकर,आकाश मालोदे, तनिषा वाड आदी उपस्थित होते.

कर्नल प्रणय पवार म्हणाले, तुम्ही कधी काश्मिरला बॉर्डरवर गेलात तर तेथील माती घेऊन या आणि ती देवाऱ्यात ठेवा. त्याची पूजा करा आणि तुमच्या मुलांना सांगा की, एक देवळातला देव आणि दुसरा देव म्हणजे ही माती, ज्या मातीत जवानांनी प्राणाची आहुती दिली आहे. तुमच्या मुलांना प्रेरणा मिळावी यासाठी त्यांना काश्मीरच्या भूमीवर घेऊन जा आणि जवानांनी केलेला संघर्षाची प्रेरणादायी गोष्ट त्यांना सांगा, असेही त्यांनी सांगितले.

जगदीश मुळीक म्हणाले, देशाच्या सिमेवर राहून सैनिक देशाची रक्षा करतात. तर आपण देशात राहून देशासाठी काम केले पाहिजे. महापुरुषांचे विचार, जवानांच्या संघर्षगाथा पुढच्या पिढीला सांगितल्या पाहिजेत. महापुरूषांच्या विचारावर व सैनिकांची प्रेरणा घेवून आपल्याला देश घडवायचा आहे. जगात भारत विश्वगुरू म्हणून सिद्ध करायचा आहे.

प्रियांका शेंडगे शिंदे म्हणाल्या, देशाच्या सिमेवर सैनिक अहोरात्र लढत असतात. मृत्यू समोर येतो, तेव्हा ते स्वतः:च्या कुटुंबाचा नाही तर देशाच्या रक्षणाचा विचार करीत असतात. त्यामुळे देशाचे जवान हे खरे हिरो आहेत. त्यांच्यासाठी काही करायचे असेल तर त्यांच्या कुटुंबाचा आधार आपण झाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. मृणमयी परळीकर व मयूर पाटील यांनी सूत्रसंचालन केले, राजाभाऊ शेंडगे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading