पुणेकरांना पुढील काही दिवस मिळणार नाही नवं पाणी कनेक्शन
पुणे : पुणे शहरामध्ये पाणी टंचाई जाणवत असताना पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गांवांना पाणी पुरवठा करणे कठीण झाले आहे.पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने आणि मागणी वाढल्याने पुणे महानगरपालिका मालमत्तांना नवीन पाणी कनेक्शन देणे तात्पुरते थांबवण्याचा विचार करत आहे. त्यामुळे पुणेकरांना पुढील काही दिवस तरी नवीन पाणी कनेक्शन मिळणार नाही.
पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चार धरणातील पाणीसाठा 9 टीएमसीने खाली आला आहे. मागील वर्षी याच कालावधीत चार धरणातील पाणीसाठा 11 टीएमसी एवढा होता. पुणे शहर आणि ग्रामीण भागासाठी पिण्याच्या गरजांसाठी पाणी आरक्षित आहे. पाऱ्याची पातळी वाढल्याने आणि शहराचा विस्तार झाल्यामुळे संभाव्य पाणी टंचाई अपेक्षित होती, असे नागरी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले. पुणे शहराला पाणी टंचाई जाणवत असल्याने पुणे महापालिका यावर उपाययोजना करत असून याचाच भाग म्हणून पुढील काही दिवस मालमत्तांना नवीन पाणी कनेक्शन न देण्याचा विचार पालिका करत आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुणे महापालिका पाणी पुरवठा विभागाने त्यांच्या प्रादेशिक कार्यालयांना मालमत्तांना नवीन पाणी कनेक्शनसाठी परवानगी थांबवण्याच्या शक्यते बाबत कळवले आहे. या महिन्याच्या अखेरीस याचा आढावा घेऊन अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यातच मागील महिन्यापासून तापमान (Temperature) 40 अंशावर पोहचल्याने शहरामध्ये पाणी वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या शहराची पाण्याची गरज भागवण्यासाठी पुणे महापालिकेला 1600 – 1700 एमएलडी पाणी उपसा करावे लागेल जे मागील वर्षी 1250 – 1300 एमएलडी होते.
पुणे महापालिकेच्या वतीने आतापर्यंत जलकुंभातून थेट लगतच्या गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. मात्र, आता नव्याने समाविष्ट झालेल्या भागातील नागरिकांना प्रक्रिया केलेले पाणी पुरवावे लागत आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच पुणे महापालिकेला नव्याने समाविष्ट झालेल्या गावातील नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले आहेत.
