जेजुरी देवस्थानच्या विश्वस्तांनी हिंदू समाजाची माफी मागावी
पुणे : मुस्लिम समाजाच्या अनुनयाची भूमिका सर्वधर्मसमभावाच्या गोंडस नावाखाली इफ्तार पार्टीचे आयोजन करीत जेजुरीच्या देवस्थानाकडून घेतली गेली. मूळात हिंदू देवस्थानांकडून असल्या उपक्रमांची अपेक्षाच नाही. त्यामुळे जेजुरी देवस्थानच्या विश्वस्तांनी मुस्लिम समाजाच्या लोकांसाठी रोजाच्या निमित्ताने केलेल्या इफ्तार पार्टीचा निषेध करीत जेजुरी देवस्थानच्या विश्वस्तांनी हिंदू समाजाची माफी मागावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद मठ मंदिर संपर्क समिती पश्चिम महाराष्ट्र प्रांताने केली आहे.
याबाबतचे पत्र धर्मादाय कार्यालय येथे परिषदेच्या मठ मंदिर संपर्क समितीचे संपर्क प्रमुख मनोहर ओक, विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री संजय मुरदाळे, प्रांत सहमंत्री अॅड.सतिश गोरडे यांनी दिले आहे. तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देखील निवेदनाची प्रत पाठविण्यात आली आहे.
मनोहर ओक म्हणाले, अन्य धर्मीय उपासना स्थानातून हिंदूधर्मानुकुल उपक्रम पुरस्कृत होतात काय ? सामाजिक सद्भावनेचा मक्ता केवळ हिंदूनी घेतला आहे काय ? हे प्रश्न यामुळे उपस्थित होतात. हिंदू समाज जो मंदिरांचे काम सुरळीत सुरू राहण्यासाठी योगदान देत असतो, त्या जेजुरी गडाच्या मंदिरात जाण्यासाठी पाय-यांची सामान्य लोकांसाठी व्यवस्थित उपलब्धता नाही.
ते पुढे म्हणाले, मागच्या बाजूला व्हीआयपी साठी व्यवस्था केलेली आहे अशीच व्यवस्था सर्वसामान्य हिंदू भाविकांसाठी होणे अपेक्षित असताना इफ्तार पार्टीचे सोंग कोणाच्या डोक्यातून निघाले आहे? हा प्रश्न आहे. त्यामुळे या पार्टीसाठी झालेला खर्च हा देवस्थानच्या विश्वस्तांकडून वसूल केला जावा व यापुढील काळात अशा इफ्तार पाटर्या कुठल्याही देवस्थानात होऊ नयेत, याची धमार्दाय आयुक्त यांनी काळजी घ्यावी. तसेच या विश्वस्तांनी हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी परिषदेतर्फे करण्यात आली आहे.