‘भक्ती-शक्ती ११ मारुती परिक्रमेत’ महाराष्ट्रातील ३०० हनुमान भक्तांचा सहभाग
पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील तरूणाईने अकरा मारुती मंदिरांचे दर्शन घेऊन समाजात राष्ट्रधर्म जागर करण्यासाठी आयोजित भक्ती शक्ती ११ मारुती परिक्रमेत महाराष्ट्रातील ३०० हनुमान भक्तांनी सहभाग घेतला. त्यातील १०० होऊन अधिक कार्यकर्ते पुण्यातून सहभागी झाले होते. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात असलेल्या ११ शक्तिस्थानांना हनुमान भक्तांनी भेट दिली.
विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांच्या वतीने भक्ती शक्ती ११ मारुती परिक्रमा करण्यात आली होती. तीन दिवसात ही परिक्रमा दुचाकी वाहनाचा वापर करून पार पडली. सज्जनगडावरील मारुतीच्या मंदिरापासून परिक्रमेला सुरुवात झाली होती. सज्जनगडाचे बाळासाहेब स्वामी, विनय पत्राळे, अनिरुद्ध पंडित, बाबूजी नाटेकर, अनघा पत्राळे, संजय मुरदाळे, सतीश गोरडे यांनी उपक्रमाकरिता मार्गदर्शन केले. तर, धनंजय चंद्रात्रे, मनोहर ओक, नागनाथ बोररगे, अशोक येलमार यांनी परिक्रमेचे नेतृत्व केले. प्रत्येक ठिकाणी मारुती स्तोत्र पठण करण्यात आले.
तरुणांना शक्तीची उपासना करण्याचा मंत्र देण्यासाठी हनुमानाचे चरित्र उपयुक्त ठरेल म्हणून समर्थांनी ११ मारुतीची स्थापना केली. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात ही ११ शक्तिस्थाने निर्माण झाली. त्यामुळे युवकांनी या ठिकाणी भेट द्यावी, याकरिता उपक्रम राबविण्यात आला. परिक्रमेसाठी विनामूल्य प्रवेश होता, स्वतःची दुचाकी घेऊन परिक्रमेत कार्यकर्ते सहभागी झाले होते. भोजनाचा व इतर सर्व खर्च विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आला. पुण्यासह, नाशिक, मालेगाव, नगर, भीमाशंकर, चिंचवड, बारामती, सातारा, कराड, इचलकरंजी, कोल्हापूर, निपाणी आदी भागांतून कार्यकर्ते परिक्रमेकरिता आले होते.