आनंदी जीवनासाठी प्रत्येक व्यक्तीने आपले छंद जोपासावे – मनोहर पारळकर
पुणे : ” आयुष्य जगताना अनेकदा आपण आपल्या आवडी-निवडी, छंद जोपासण्याकडे दुर्लक्ष करतो. मग निवृत्तीनंतर काय करायचे असा प्रश्न आपल्याला पडतो. त्यातून आपले जीवन उदासीन होते. आपल्या कुटुंबातील व्यक्तींशी खटके उडू लागतात, कारण आपणच खुश नसलो तर आपल्या आसपासच्या लोकांना कसे खुश ठेवणार? त्यामुळेच आनंदी राहण्यासाठी व्यक्तीने आपले छंद जोपासले पाहिजे,” असे मत टाटा मोटर्स’च्या मनुष्यबळ विभागाचे निवृत्त वरिष्ठ महासंचालक मनोहर पारळकर यांनी व्यक्त केले.
आशा वडुजकर लिखित ‘माझं ऑस्ट्रेलिया भ्रमण’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी, दिनांक तीन मार्च रोजी आपटे रस्ता येथील श्रुती मंगल कार्यालय येथे संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टाटा मोटर्स’च्या मनुष्यबळ विभागाचे निवृत्त वरिष्ठ महासंचालक मनोहर पारळकर हे होते. तर लेखक प्रकाश तांबे, वल्लरी प्रकाशन’चे संचालक व्यंकटेश कल्याणकर, यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुस्तकाबाबत आपल्या भावना व्यक्त करताना लेखिका आशा वडुजकर म्हणाल्या,” पती निधनानंतर साधारण 2000 साली मी माझ्या मुलीसोबत ऑस्ट्रेलियाला गेले. मुलीच्या आग्रहास्तव मी तेथील कम्युनिटी क्लबमध्ये प्रवेश घेतला. इंग्रजी येत नसतानाही तेथील मैत्रीणींनी मला अतिशय चांगल्याप्रकारे त्यांच्यामध्ये समाविष्ट करून घेतले. पुढे त्यांच्यासोबत बरेच ठिकाणी फिरणे झाले आणि ऑस्ट्रेलिया देशाचे अनेक पैलू उलगडले.
माणसं स्वप्न पाहतात. त्यासाठी झोकून देऊन काम करतात. पण मी ऑस्ट्रेलियाला जाणं, तिथल्या समाजाचा एक भाग होणं आणि त्यावर हे पुस्तक लिहणं हे माझ्यासाठी खरोखरच स्वप्नापलीकडील गोष्ट आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीता पक्ती यांनी केले, प्रस्ताविक प्रकाश तांबे यांनी केले तर बापू देशपांडे यांनी आभार मानले.