Thursday, June 18, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अनिल देशमुखांचा राजीनामा घेणं ही आमची चूक होती- संजय राऊत

नागपूर :राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेली कारवाई हा चर्चेचा विषय ठरली आहे. या प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या तुरुंगात आहेत. मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझेकडून १०० कोटींच्या वसुली प्रकरणी अनिल देशमुखांवर ईडीने ही कारवाई केली आहे. महाविकास आघाडी सरकारने अनिल देशमुखांचा राजीनामा घेऊन गृहमंत्रीपदाची जबाबदारी दिलीप वळसे-पाटलांकडे सोपलवली. परंतू अनिल देशमुखांचा राजीनामा घेण्याचा निर्णय घाईघाईत झाल्याची प्रतिक्रीया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे, ते नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

“अनिल देशमुखांचा राजीनामा घेण्याचा निर्णय घाईघाईत झाला असं मला वाटतं. त्यांच्या बाबतीत आम्ही थोडं संयमाने घ्यायला पाहिजे होतं. कारण अनिल देशमुखांच्या संदर्भात काय पुरावे होते हे आम्ही पाहिले आहेत. अनिल देशमुखांवर कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत. केंद्रीय तपासयंत्रणांनी त्यांच्यावर शेकडो धाडी घातल्या. सीबीआयने २२ धाडी घाडल्या, ईडीने ५० च्या वर धाडी घातल्या, आयकर विभागाने ४० धाडी घातल्या. इतक्या धाडी घालून तुम्हाला कोणता विक्रम प्रस्थापित करायचा होता?” असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला.
अनिल देशमुखांचा राजीनामा घेण्यासाठी शरद पवारांवर दबाव होता का असा प्रश्न विचारला असता संजय राऊतांनी मला असं वाटत नाही असं उत्तर दिलं. नवाब मलिकांचा राजीनामा राज्य सरकार घेत नाही यावरुन प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले, “आम्ही मलिकांचा राजीनामा का घ्यायचा? अनिल देशमुखांचा राजीनामा घेणं ही आमची चूक होती, त्यांचा राजीनामा घ्यायला नको होता हे मी आजही म्हणतो आहे. नवाब मलिक हे कॅबिटेनमध्येच राहतील. भाजपचा जो भ्रम होता की आम्ही सर्व कॅबिनेट मंत्र्यांना जेलमध्ये टाकू, हे आम्हीही पाहून घेऊ. जसं तुमच्याकडे केंद्रीय यंत्रणा आहेत तसंच आमच्याकडे राज्याचे पोलीस आहेत. महाराष्ट्राचे पोलीस हे सक्षमपणे काम करत आहेत हे तुम्हाला येत्या काही दिवसांमध्ये पहायला मिळेल. त्यामुळे कॅबिनेट जेलमध्ये जातं की आणखी कोणी जातं हे लवकरच कळेल.”
संपूर्ण देशभरात भाजप सध्या सूडाचं राजकारण करत आहे. केंद्रीय तपासयंत्रणांचा सरकारने खुळखुळा करुन टाकला आहे. कारवाईची भीती ते दाखवत आहेत, ज्याचा मी देखील एक व्हिक्टीम आहे. माझ्यासारख्या मध्यमवर्गीय माणसावर आरोप ठेवण्यात आले, एक वर्ष झालं पण अद्याप त्यांना चौकशीत काय सापडलं? UPA च्या काळात फार कमी कारवाया होत होत्या, मात्र आता त्यात प्रचंड वाढ झाली आहे. यामागचा हेतू काय आहे? या कारवायांमधून काय सापडलं? असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला आहे. आमची बदनामी करुन, भिती दाखवून तुम्ही शिवसेनेला ना वाकवू शकत ना आमच्या आघाडीचा केस वाकडा करु शकत असं म्हणत राऊतांनी भाजपला आव्हान दिलं आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading