लता मंगेशकर यांचे कुणीही स्थान घेऊ शकणार नाही – मोहन भागवत
पुणे : दिदींच्या जाण्याने जगात सगळ्यांना तणाव मुक्त करणारा स्वर हरपला. त्यांचे जाणे मंगेशकर कुटुंबीयांसाठी तो वज्रघात आहे. कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली असून संगीताच्या क्षेत्रात हा स्वर पुन्हा होणे नाही. देशात कुणीही त्याचे स्थान घेऊ शकणार नाही, अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्यावतीने भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्रद्धांजली वाहिली . याप्रसंगी , पंडीत हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ कराड, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, प्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड, धनंजय केळकर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना मोहन भागवत म्हणाले, दीदींना दिरोदत्त स्वर मिळाला होता. त्यांनी दादरा नगर हवेली धान्याचा पुरवठा केला, हे फार थोड्या लोकांना माहिती आहे. असे कितीतरी कार्य दिदिने केले आहे. लहानपणी अत्यंत खडतर जीवन त्यांच्या वाट्याला आले. मात्र, परिस्थितीचा त्यांनी धैर्याने सामना केला. दीदी जास्त शिकल्या नाहीत. मात्र, शिकल्या असत्या तर जगात सगळ्यात सुशिक्षिक्तांची रांगेत त्या असत्या, असेही ते म्हणाले.
यावेळी आशा भोसले याना अश्रू अनावर झाले. त्यांनी सअश्रू नायनांनी लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. हृदयनाथ मंगेशकर यांनाही अश्रू अनावर झाले.
