Friday, June 5, 2026
Latest NewsMAHARASHTRA

अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लावून एकरी ५० हजार रुपये मदत द्या जनशक्ती ची मंत्री जयंत पाटील यांच्याकडे मागणी

करमाळा: करमाळा माढा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यामध्ये उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. सुमारे 70 टक्के उसाचे गाळप झाले असून अद्याप 30 टक्के गावात होणे बाकी आहे. तुर्तास बांधावर उभ्या असलेल्या उसाला तुरे फुटल्याने उसाचे वजन भरणे कठीण झाले आहे. त्यामुळे अशा उसाची कारखाना दखल घेत नाही. त्यामुळे महसूल विभागामार्फत या उसाचे पंचनामे करून एकरी ५० हजार रुपयाची मदत द्या यासह अन्य मागण्यांचे निवेदन जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिले.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, करमाळा तालुक्यात पंधरा ते वीस लाख मे टन उसाचे गाळप होणे बाकी आहे. शिवारात उभा असलेला ऊस कसा जाणार…? कधी जाणार…? कोणत्या कारखान्याला जाणार..? यासह अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आ वासून उभे आहेत. शिवारातील ऊस लवकर जावावा यासाठी शेतकरी राजा प्रयत्नशील असताना कारखानदार, वाहतूकदार, ऊस तोड कामगार व कारखान्याचे कर्मचारीशेतकऱ्यांची मोठी लूट करत आहेत. याकडे शासनाने जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात शेतकरी व शेती पासून परावृत्त होईल असे सांगून जिल्ह्यातील संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाने बंद करू नये, उसाचे बिल आठ दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, उसासाठी शेतकऱ्यांना अनुदान सुरू करावे, आदिनाथ कारखान्याचे खासगीकरण करू नये यासह अनेक मागण्या या निवेदनात करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading