छत्रपती शिवराय हे सर्वसामान्यांचे व शेतकऱ्यांचे राजे – शाहीर हेमंतराजे मावळे
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्याची जमीन सोन्याच्या फाळाने नांगरुन आपण शेतक-यांचे प्रतिनीधी असल्याचे त्यांनी सिद्ध केले. त्यामुळेच शिवाजी महाराज हे सर्वसामान्यांचे व शेतक-यांचे राजे होते, असे मत शाहीर हेमंतराजे मावळे यांनी व्यक्त केले.
पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूलतर्फे न-हे येथील संस्थेच्या सभागृहात शिवजयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर आणि उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर यांनी त्याचा सन्मान केला.
शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, शिवाजी महाराजांच्या काळात महिला सुरक्षित होत्या. महाराजांनी आपल्या जीवनात महिलांना विशेष महत्त्व दिले. जिजाऊंचा एकही शब्द खाली पडू दिला नाही. जिजाऊ शिवबाच्या शब्दासाठी सती जाण्यापासून देखीलपरावृत्त झाल्या. स्त्रीवर झालेला अत्याचार पाहून त्यांनी रांज्याच्या पाटलालाही कडक शिक्षा सुनावली. न्यायाचे राज्य त्यांनी केले. कल्याणच्या सुभेदाराच्या सूनेला सन्मानपूर्वक वागणूक दिली असे सांगताना त्यांनी अनेक उदाहरणे दिली.
अॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून शाहिरांनी आपल्या शाहीरीतून लोकजागृतीचे काम केले आहे. त्यांचे हे कार्य आजही अनेक शाहीर पुढे चालवित आहेत. शाहिरी परंपरा आणि शिवरायांचे कर्तृत्व इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना देखील समजावे, याकरीता शाहिरीच्या माध्यमातून इतिहास विद्यार्थ्यांपुढे ठेवण्याचा प्रयत्न संस्थेतर्फे करण्यात आला.
