हक्काच्या शिक्षणासाठी संघर्ष करणे गुन्हा आहे का? – अभाविप
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात येथे सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी अभाविप चे कार्यकर्ते उपस्थित विद्यार्थ्यांना विद्यापीठ कायदा विषयातील पत्रक वाटत असताना पोलीसांनी त्यांच्या सोबत गैरव्यवहार करून त्यांना दिवसभर अटक करून ठेवले. राज्य शासनाच्या वतीने विद्यापीठ कायद्यात बदल करून विद्यापीठाची स्वायत्तता धोक्यात आणण्याचा दुर्दैवी कायदा पारीत करण्यात आला.
या कायद्याच्या विरोधात अभाविप ठिकठिकाणी विरोध केला. परंतु, राज्य शासनाने यावर काही लक्ष देऊन विद्यार्थी हितात निर्णय घेतला नाही. आज दिनांक १४ फेब्रुवारी ला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम होता, या कार्यक्रमाला माननीय राज्यपाल, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत,अन्य प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. याठिकाणी अभाविप पुणे महानगराचे कार्यकर्ते विद्यापीठ कायद्याच्या विषयातील पत्रक उपस्थित विद्यार्थ्यांना वाटताना आणि या कायद्याचे दुष्परिणाम स्पष्ट करत असताना तिथे उपस्थित पोलीसांनी अभाविप च्या कार्यकर्त्यांना थांबवले व पत्रक वाटपासाठी मनाई केली.
पोलीसांनी अडवल्यानंतर अभाविप च्या कार्यकर्त्यांनी पत्रक वाटण्यास थांबविले. तरीदेखील, पोलीसांनी कार्यकर्त्यांसोबत गैरव्यवहार करून त्यांचे मोबाईल जप्त करून घेतले. व बळजबरीने त्यांना पूर्ण दिवस अटक करून ठेवले. विद्यार्थ्यांच्या हक्काच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना जागरूत करणे म्हणजे महाराष्ट्रात गुन्हा मानला जातो का असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा आहे.
