डॉ. प्रमोद चौधरी यांना प्रतिष्ठेचा विल्यम सी. होल्मबर्ग पुरस्कार जाहीर
पुणे: प्राज इंडस्ट्रीज चे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांना २०२२ चा प्रतिष्ठित विल्यम सी. होल्मबर्ग जैवअर्थशास्त्रातील जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा जागतिक सन्मान मिळवणारे ते पहिले आशियाई व्यक्ती आहेत. जैव अर्थव्यवस्थेतील त्यांच्या अनुकरणीय कार्याची ही एकप्रकारे पावतीच होय.
२०१४ पासून, विल्यम सी. होल्मबर्ग पुरस्कार जगभरातील प्रतिष्ठित व्यक्तींना त्यांच्या जैव अर्थव्यवस्थेतील उत्कृष्ट योगदानासाठी प्रदान केला जात जातो. जैव अर्थव्यवस्थेतील अग्रगण्य योगदानाबद्दल तसेच अमेरिकेचा ऊर्जा विभाग (DoE) आणि पर्यावरण संरक्षण संस्था (EPA) यांच्या नूतनीकरणक्षम इंधन कार्यक्रमाचे जनक या नात्याने हा पुरस्कार प्रथम मिळवणाऱ्या लेफ्टनंट कर्नल विल्यम होल्मबर्ग यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येतो.
अमेरिकेतील बायोफ्यूल्स डायजेस्ट द्वारा स्थापित, विल्यम सी. होल्मबर्ग पुरस्कार हा उद्योग तज्ञ आणि दिग्गजांच्या जागतिक पॅनेलच्या कठोर मूल्यांकनाद्वारे दिला जातो. या पुरस्काराच्या आधीच्या प्राप्त्यकर्त्यांमध्ये अमेरिका तसेच युरोपमधील कायदेतज्ज्ञ, उद्योग नियामक आणि जागतिक उद्योग प्रमुखांचा समावेश होता.
या पुरस्काराची घोषणा करताना, बायोफ्यूल्स डायजेस्टचे संस्थापक आणि संपादक जिम लेन म्हणाले, “शून्य कार्बन सिव्हिलायझेशनचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी प्रगत जैव अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रातील तांत्रिक प्रगतीसह जागतिक जैव अर्थव्यवस्थेतील त्यांच्या स्थिर नेतृत्वासाठी डॉ. प्रमोद चौधरी यांची पॅनलने एकमताने निवड केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.”
या घडामोडीवर बोलताना डॉ.चौधरी म्हणाले की,” या पुरस्काराच्या घोषणेबद्दल माहिती मिळाल्यावर मला आनंद झाला. पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञाने विकसित आणि उपयोजित करण्यासाठी गेल्या चार दशकांपासून प्राजच्या टीमच्या प्रयत्नांचा दाखला म्हणून मी या पुरस्काराकडे पाहतो. जैव अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून ऊर्जा संक्रमणामध्ये भारताच्या क्षमतेची जग योग्य दखल घेत आहे याचा मला विशेष आनंद आहे.”
१७ मार्च रोजी अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे होणाऱ्या ऍडव्हान्स बायोइकॉनॉमी लीडरशिप कॉन्फरन्स (ABLC) २०२२ या प्रमुख जागतिक संमेलनात डॉ. चौधरी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
ग्लासगो येथे नुकत्याच पार पडलेल्या COP26 हवामान बदल शिखर परिषदेत भारताने बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर इथेनॉल मॅन म्हणून सर्वत्र प्रशंसित डॉ. चौधरी यांना हा पुरस्कार मिळणे खूप महत्त्वाचे आहे. COP26 शिखर परिषदेने शाश्वत हवामान कृतीत, प्रगत जैव अर्थव्यवस्था एक महत्त्वाची भूमिका बजावेल असे मान्य केले. या पार्श्वभूमीवर, जागतिक जैव अर्थव्यवस्थेतील भारताच्या वाढत्या कौशल्याची आणि हवामान संकटाशी लढा देण्यातील योगदानाची ओळख म्हणून या पुरस्काराकडे पाहिले जात आहे.
