प्रसन्न ट्रॅव्हल्सचे संस्थापक रायाकाका पटवर्धन यांचे निधन
पुणे : प्रसन्न ट्रॅव्हल्सचे संस्थापक रायाकाका पटवर्धन ह्यांचे आज सकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांचे वय ९0 वर्षांचे होते. राया काकांच्या मागे त्यांच्या पत्नी, दोन मुल, दोन नातु व दोन नाती तसेच पंतवंड असा मोठा परिवार आहे.
केशव वामन पटवर्धन यांना रायाकाका या टोपण नावाने ओळखले जात. उत्तम कबड्डीपटू असलेले रायाकाका रेल्वेच्या राष्ट्रीय कबड्डी संघात होते. महापालिकेतही त्यांनी काही काळ नोकरी केली. १९६४ मध्ये त्यांनी प्रसन्न ट्रॅव्हल्सची स्थापना केली. तेव्हा मोटारींद्वारे प्रवासाची सुविधा ते पुणे विद्यापीठाला पुरवित असे. तत्पूर्वी काही काळ त्यांनी दुधाचा व्यवसायही केला. सचोटी, वक्तशीरपणा व एकही दिवसाचा खाडा नाही ह्या गुणांमुळे व्यवसाय वृद्धिंगत झाला.
उद्यमशील असलेल्या रायाकाकांचा समाजातील अनेक संस्था, संघटनांशी निकटचा संपर्क होता. समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व असलेले रायाकाका सुरुवातीला शुक्रवार पेठेत तुळशी बागेजवळ राहत. तेथील जिलब्या मारुती सार्वजनिक मंडळांचे ते सुमारे २० वर्षे अध्यक्ष होते.
त्यांचे धाकटे चिरंजीव प्रसन्न पटवर्धन यांनी त्यांच्या ट्रॅवल कंपनीचा प्रसन्न पर्पल ह्या नावाने देशभर विस्तार केला आणि एक अग्रणी संस्था म्हणुन नावारूपाला आणली. रायाकाकांचे थोरले चिरंजीव डॉ. भूषण पटवर्धन हे विद्यापीठ अनुदान आयोगचे माजी उपाध्यक्ष होते. आयुष मंत्रालयाचेही ते सल्लागार असून शैक्षणिक क्षेत्रात ते सक्रिय आहेत.
रायाकाकांच्या प्रेरणेतुनच त्यांचा पुतण्या श्रीराम भावे यांनी वाडेश्वर रेस्टॉरंट ची स्थापना केली आणि त्यांचा मुलगा स्वानंद भावे याने त्याचा विस्तार केला.
