छत्रपती संभाजी महाराजां सारख्या राज्यकर्त्याची महाराष्ट्राला गरज-विकास पासलकर
पुणे:छत्रपती संभाजी महाराज हे दूरदृष्टीचे राजे होते. सर्वांना सोबत घेऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारसा पुढे चालवला. चारित्र्यसंपन्न व गुणवान राजा म्हणून संभाजीराजे यांची ओळख होती. बुधभूषण, सातसतक, नायिकाभेद, नखशिक असे वैचारिक ग्रंथ त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी लिहिलेले. उत्तम संस्कृत पंडित असून त्यांचे सगळ्या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. न्यायनीती धुरंदर, कार्यतत्पर व लोकाभिमुख राजा म्हणून संभाजीराजे यांची ओळख आहे. दीडशे पेक्षा जास्त लढाया लढून त्यांनी सगळ्या लढाया जिंकल्या. महाराष्ट्राला समृद्ध आणि कार्यक्षम ठेवायचा असेल तर भविष्यात छत्रपती संभाजी महाराजां सारख्या राज्यकर्त्यांची महाराष्ट्राला गरज आहे. संभाजी राजांचा आदर्श प्रत्येकाने घेतला पाहिजे, हीच काळाची गरज आहे असे मत… अखिल भारतीय शिव महोत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर यांनी व्यक्त केले.
छत्रपतींच्या मावळ्यांनी आता एकत्र येण्याची गरज आहे. मराठ्यांचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा असून सुद्धा त्यांचे वैचारिक मावळे एकत्र येऊन लढत नाहीत. आज प्रत्येकाने एकत्र येण्याची गरज आहे. भोर, वेल्हा, मुळशी छत्रपतींच्या मावळ्यांची सरदारांची आणि सहकार्याची भूमी आहे. त्यांचा वैचारिक वारसा जतन करण्यासाठी छत्रपतींच्या विचारांचा जागर झाला पाहिजे… असे मत कोथरूड विधानसभेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी व्यक्त केले.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्ताने अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती व संभाजी ब्रिगेडच्या वतीने डेक्कन येथे राज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत धुमाळ, दत्ताभाऊ पासलकर , श्रीकांत बराटे , महादेव मातेरे, जितेंद्र साळुंखे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत धुमाळ यांनी केले तर आभार विराज तावरे यांनी व्यक्त केले.