Sunday, June 21, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त भागाची पाहणी; मृताच्या कुटुंबियास चार लाख देण्याची पशुसंवर्धन मंत्र्यांची घोषणा

नागपूर : अवकाळी पाऊस व गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीमुळे नागपूर जिल्ह्यातील अनेक गावांना तडाखा बसला आहे. आज या भागाची पाहणी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केली. यावेळी लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणेने समन्वयात काम करुन आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी त्यांनी नागपूर तालुक्यातील बोखारा गावास प्रथम भेट देऊन नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्या हेमंत रोशन निवते यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांचे आस्थापूर्वक विचारपूस करुन सांत्वन केले. मृत मुलगा दुग्ध वाटपाचे काम करत होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबियास पशुसंवर्धन विभागाच्या योजनेतून गाय व म्हसी देण्यासोबत सानुग्रह अनुदान म्हणून चार लाख रुपये देण्याची घोषणा पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केली. शासकीय योजनेतून गुरांचा गोठा मंजूर करण्याच्या सूचना त्यांनी गटविकास अधिकारी व तहसीलदार यांनी दिल्या.

राज्यशासनातर्फे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. सर्वे करतांना शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थाने नुकसान झाले आहे त्यांना मदत करा. त्यासोबत ग्रामीण भागातील गरीब व झोपडीपटीतील लोकांचेही नुकसान झाले आहे. त्याचाही सर्वे करा. जिल्हा परिषद, पंचायत समिती, व ग्रामपंचाय सदस्यांनी या कामात शासकीय यंत्रणेला सर्वे करण्यासाठी सहकार्य करावे.

या दौऱ्यात त्यांनी  नागपूर तालुक्यातील बोखारा, गुमथळा, बैलवाडा, कामठी तालुक्यातील गुमथी, लोणखैरी, सावनेर तालुक्यातील दहेगाव(रं), पारशिवणी तालुक्यातील  इटगांव, भागीमहारी, रामटेक तालुक्यातील जमुनीया, टुयापार, घोटी, फुलझरी या गावातील अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे हानी झालेल्या शेतांची पाहणी केली.

जिल्ह्यात जवळपास 7 हजार 431 हेक्टर क्षेत्रांमध्ये कापूस,गहू,हरभरा, तूर,उ्न्हा ळी भुईमुग, भाजीपाला व संत्रा व टमाटर या फळपिकांचे नुकसान झाले आहे. 8 हजार 334 खातेधारकांना या अवकाळी पावसाचा फटका बसला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या अवकाळी पावसाने सर्वाधिक फटका तुरीला बसला असून दीड हजार हेक्टरमधील तुरीचे नुकसान झाले आहे.

या दौऱ्यात त्यांचेसमवेत जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुमित्रा कुंभारे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती तापेश्वर वैद्य, जि.प.  सदस्य कुंदा राऊत, प्रकाश खापरे, राजु कुसुबे, दुधाराम सव्वालाखे, शांता कुमरे, उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश  भोयर तसेच पंचायत समितीचे सभापती, सदस्य, अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading