आंबेगाव, मावळ येथील बैलगाडा शर्यत अचानक रद्द
पुणे : तब्बल चार वर्षांनंतर होणारी आंबेगाव येथील बैलगाडा शर्यत कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केली आहे. त्यामुळे बैलगाडा मालाकांचा हिरमोड झाला आहे. दरम्यान या शर्यतीचे आयोजक शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी दिल्यानंतर तब्बल चार वर्षांनंतर आज (1 जानेवारी) पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे ही पहिली बैलगाडा शर्यत भरवण्यात आली होती. राज्यातील ही सर्वात मोठी शर्यत होणार होती. या बैलगाडा शर्यतीमध्ये राज्यभरातून जवळपास 701 बैलगाडा मालक सहभागी होणार होते.
दरम्यान, शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी ठिय्या आंदोलन केले आणि अर्ध्या तासाने मागे घेतली.
बैलगाडा शर्यत रद्द करण्यात काहीतरी काळबेर
“सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर आज राज्यातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत पार पडणार होती. मात्र रात्री अचानक या शर्यतीसाठी परवानगी नाकारण्यात आली. मला यामध्ये काहीतरी काळबेर असल्याचे वाटत आहे ”
– शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील
जिल्हाधिकाऱ्यांना सर्व अधिकार
“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या मार्गदर्शक सुचनामनुसार स्थानिक पातळीवर सर्व निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकार्यांना आहेत. शिवाय काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या शर्यती संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.”
– अजित पवार उपमुख्यमंत्री
