लखीमपूर हिंसाचार हा पूर्वनियोजित कट – एसआयटी
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथेकृषी कायद्यांचा निषेधार्थ आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांना झालेला अपघात हा पूर्वनियोजित कट असल्याचे एसआयटीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता सदर प्रकरणातील 14 मुख्य आरोपींवर जाणीवपूर्वक नियोजन करुन गुन्हा केल्याची कलमे लावण्यात आली आहेत. या प्रकरणात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा हा देखील मुख्य आरोपी आहे.
काही दिवसांपूर्वी 3 ऑक्टोबर 2021 रोजी उत्तर प्रदेशामधील लखीमपूर खेरी येथील टिकुनिया येथील एका कार्यक्रमात कृषी कायद्यांचा निषेध करत असलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर चारचाकी गाडी घालण्यात आली. यामध्ये चार शेतकऱ्यांचा जागीच चिरडून मृत्यू झाला. या घटनेनंतर उसळलेल्या हिंसाचारात काही लोकांचा मृत्यूही झाला होता. शेतकऱ्यांना चिरडणारी गाडी ही अजय मिश्रा टेनी यांची असून घटनेच्या वेळी आशिष मिश्रा गाडीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची पहिली सुनावणी 8 ऑक्टोबर रोजी झाली. त्यानंतर आशिष मिश्रा याला अटक करण्यात आली आहे.
फोटो – संग्रही
