कॉँग्रेसच्या बैठकीत सोनिया गांधी यांचा आक्रमक पवित्रा, G23 नेत्यांची कानउघडणी
नवी दिल्ली – काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष असल्याने पूर्णवेळ अध्यक्ष नेमण्याची मागणी होत आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत दुफळी माजली आहे. अनेक नेत्यांमध्ये वाद विवाद सुरू आहेत. पूर्णवेळ अध्यक्षपदाची मागणी करणाऱ्या काँग्रेस नेत्यांचे नाव न घेता, सोनिया गांधी यांनी त्या काँग्रेसची स्थायी अध्यक्ष असल्याचे म्हणत विरोधकांना उत्तर दिले आहे. काँग्रेस अध्यक्ष आणि संघटनेच्या निवडणुका लक्षात घेऊन आयोजित केलेल्या या बैठकीत सोनिया गांधींनी भाषणाच्या सुरुवातीलाच काँग्रेसच्या प्रत्येक सदस्याला पक्षाचे पुनरुज्जीवन हवे आहे पण या ऐक्यासाठी आणि पक्षाचे हित असणे आवश्यक आहे असे म्हटले.
“मी नेहमीच स्पष्टतेचे कौतुक केले आहे, माध्यमांद्वारे माझ्याशी बोलण्याची गरज नाही. आपण सर्वांनी प्रामाणिक चर्चा करूया,” असे सोनिया गांधी म्हणाल्या. तसेच संघटनात्मक निवडणुका आणि अध्यक्षांच्या निवडीबाबत सोनिया गांधी यांनी भाष्य केले आहे. “आम्ही ३० जूनपर्यंत काँग्रेसच्या नियमित अध्यक्षांच्या निवडीचा रोडमॅप अंतिम केला होता, पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मुदत अनिश्चित काळासाठी वाढवण्यात आली. आज स्पष्टता आणण्याची संधी आहे,” असे सोनिया गांधी म्हणाल्या.
आगामी विधानसभा निवडणुकांविषयी बोलताना काँग्रेस अध्यक्ष्या सोनिया गांधी म्हणाल्या, “आम्हाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल, पण जर आपण एकजूट आणि शिस्तबद्ध राहिलो आणि केवळ पक्षाच्या हितावर लक्ष केंद्रित केले तर मला खात्री आहे की आम्ही चांगले काम करू.” उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाल्याची माहितीही सोनिया गांधी यांनी दिली.
यावेळी सोनिया गांधी यांनी लखीमपूर खेरीच्या घटनेवरही भाष्य केले. अलीकडे लखीमपूर-खेरीसारख्या धक्कादायक घटना भाजपाची मानसिकता दर्शवतात. यातून ते शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे कसे पाहत आहेत ते स्पष्ट दिसते. यातून स्पष्ट दिसते की भाजपा शेतकऱ्यांच्या जीवनाच्या आणि त्यांच्या उपजीविकेच्या संरक्षणासाठी या स्थिर संघर्षाला कसे सामोरे जात आहे.”