दिवाळी नंतर कोरोनाची तिसरी लाट येणार? वाचा, काय म्हणाले राजेश टोपे
जालना : राज्यात कोरोनाची दुसरी लाटओसरल्याने आता सर्व बाजारपेठा, शाळा आणि सिनेमागृह सुरू करण्यात आले आहे. मात्र, अजूनही कोरोनाची तिसरी लाट येण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. पण, ‘दिवाळीनंतर तिसरी लाट आली तरी ती जास्त प्रभावी ठरणार नाही’ अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
टोपे म्हणाले, ‘टास्क फोर्सने सांगितल्याप्रमाणे ऑक्टोबरनंतर किंवा दिवाळीनंतर तिसरी लाट आली तरी ती जास्त प्रभावी ठरणार नाही,त्याचा मोठा परीणाम होणार नाही. असं अधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेनंतर लक्षात आलं आहे. अमेरिका, युरोपमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली पण तिचा प्रभाव जास्त दिसून आला नाही. मात्र लसीकरणामुळे कोरोनाची दाहकता कमी करता येऊ शकते, असंही ते म्हणाले.
‘परभणी जिल्ह्यात एका विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्यानं शाळा 10 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात शालेय शिक्षण विभागाला आरोग्य विभागाने काही सूचना केल्या असून आणखी अशी घटना घडल्यास शालेय शिक्षण आणि विभाग त्या सूचनेनुसार निर्णय घेईल, असंही टोपे म्हणाले.
‘नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत असली तरी तिथे काळजी करण्याची गरज नाही. तिथे लसीकरण वाढवण्यासोबतच कोरोना टेस्टिंग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्याचंही टोपे यांनी सांगितलं.
कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागानं ‘मिशन कवचकुंडल’अभियान सुरू केलं आहे. या अभियानाअंतर्गत राज्यात दररोज 15 लाख जणांना लसीकरण करण्याचं टार्गेट ठेवण्यात आलं आहे. पण राज्यात लसींचा साठा उपलब्ध असताना देखील काल राज्यात १५ लाख लशीचं टार्गेट पूर्ण झालं नाही. याबद्दल टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं असून सुरू असलेला पाऊस, अतिवृष्टी आणि सध्या कामांचे दिवस असल्याने ठरवलेला आकडा गाठता आला नाही पण यासंदर्भात अधिकाऱ्यांची २ वेळा बैठक घेण्यात आली असून लसीकरण करणं हे आरोग्य विभागासमोर आव्हान आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले जातील, असं टोपे यांनी म्हटलं आहे.