‘अप्रेंटिसशिप’च्या माध्यमातून दहा हजार युवक – युवतींना रोजगार मिळणार
पिंपरी : भारत सरकारच्या कौशल्य विकास व स्वयंरोजगार मंत्रालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम (एनएपीएस) अंतर्गत युवक युवतींसाठी रोजगार निर्मिती करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीमची माहिती जास्तीत जास्त उद्योग- व्यवसायिकांना मिळावी यासाठी एमआयडीसी भोसरी येथे सॉफ्टझील टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड व ऑल इंडिया रबर असोसिएशन आणि रबर सेक्टर स्किल कॉन्सिल यांच्या संयुक्त विद्यमानाने नॅशनल अप्रेंटिसशिप अवेरनेस प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते. या अवेरनेस प्रोग्रामच्या माध्यमातून जवळपास दहा हजार युवक युवतींना रोजगार मिळणार आहे.
यावेळी सुचिता रॉय (प्रादेशिक व्यवस्थापक – पश्चिम रबर, रासायनिक आणि पेट्रोकेमिकल कौशल्य विकास परिषद), सदाशिव पी. काळे (अध्यक्ष- पुणे चॅप्टर, ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशन), दौलत बाफाना (व्यवस्थापकीय संचालक, सॉफ्टझील टेक्नॉलॉजी प्रा. लि.) विक्रम माकर – (अध्यक्ष, ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशन), प्रशांत वाणी – (अध्यक्ष – वेस्टर्न रीजन, ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशन), रोहित बंसल – (उपाध्यक्ष- ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशन), विनोद पाटकोटवार – (व्यवस्थापकीय कमिटी, ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशन) आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नॅशनल अप्रेंटिसशिप अवेरनेस प्रोग्रामचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार करून युवकांना रोजगाराच्या अनेक संधी सॉफ्टझील टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडने निर्माण केल्याबद्दल ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशनचे विक्रम माकर यांच्या वतीने संचालक दौलत बाफना यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
सुचिता रॉय म्हणाल्या, नॅशनल अप्रेंटिसशिप प्रोग्रामच्या अंतर्गत आपण विविध इंडस्ट्रीजसाठी अप्रेंटिसशिप प्रमोशन करत आहोत, त्यांनी अप्रेंटिसशिपसाठी सदस्य नेमणे गरजेचे आहे, यामुळे इंडस्ट्री व बेरोजगार युवक युवतींना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. त्याच बरोबर विद्यार्थी सरकारच्या कौशल्य विकास अंतर्गत प्रशिक्षण घेऊ शकतात. या सर्व गोष्टींमुळे विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये अप्रेंटिसशिप म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे.
दौलत बाफना म्हणाले, करोनाच्या पहिल्या लाटेत देशातील सर्व उद्योग व्यवसाय बंद होते, परंतु आता परिस्थिती आटोक्यात येत आहे. याकाळात अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. त्यात नवीन येणारे युवक युवतींना जॉब मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यांना रोजगाराच्या प्रवाहात आणण्यासाठी भारत सरकारची अप्रेंटिसशिप योजना फायदेशीर ठरणारी आहे. त्यामुळे उद्योग व्यवसायांना आर्थिक आधार मिळणार आहे.
