तातडीने ओला दुष्काळ जाहीर करा, सरसकट नुकसान भरपाई द्या : रेखा ठाकूर
अकोला : पावसानं मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पीके नष्ट झाली आहेत. त्यामुळे सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ पैसे जमा करावेत, अशी मागणी वंचित बहूजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी केली आहे.
रेखा ठाकूर यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकारने केवळ घोषणा न करता शेतकऱ्यांना शासनाकडून तात्काळ मदत मिळणे गरजेचे आहे. सरकारकडून फक्त पंचनाम्याचे आदेश दिले जात आहेत, यापलीकडे काही केलं जात नाही. सरकारने हे ढोंग बंद करून तातडीने नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. पावसामुळे सरकारी 33% नुकसानीच्या निकषांहून अधिक पिकांचं नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर होणे गरजेचे आहे. ओल्या दुष्काळाकरीता कोरडवाहू शेतीसाठी जवळपास 13 हजार रुपये प्रति हेक्टर आणि बागायती शेतीसाठी जवळपास 18 हजार रुपये प्रती हेक्टर नुकसान भरपाई जाहीर होते. ही नुकसानभरपाई अपुरी असून अल्पबाधित शेतकऱ्यांना 50 हजार रुपये आणि जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपये सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी वंचित बहूजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी केली आहे.