फीमाफीसाठी आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्याला महात्मा फुले महाविद्यालयाकडून बेदम मारहाण, ABVP मुळे मिळाला न्याय
पिंपरी : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा कॉलेज बंद आहेत. पण तरीही विद्यार्थ्यांकडून पूर्ण फी आकारण्यात येत आहे आणि त्यांच्यावर फी भरण्यासाठी जबरदस्ती करण्यात येत आहे. जर फी भरली नाही तर रिजल्ट मिळणार नाही अशा भाषेत विद्यार्थ्यांची पिळवणूक केली जात आहे. असेच एक प्रकरण महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी येथून समोर आले आहे.
या महाविद्यालयातील बी.व्हॉक विभागाच्या तिसऱ्या वर्षाच्या मुलांची पिळवणूक होत होती. त्यामुळे मुलांनी महाविद्यालयात जाऊन काही दिवसांपूर्वी यासंदर्भात आवाज उठवला होता आणि फी ३० टक्के कमी करण्याची मागणी केली होती. महाविद्यालयाच्या उपप्राचार्यांनी फी ३० टक्के कमी करण्याची विद्यार्थ्यांची मागणी मंजूर केली आणि एक अर्ज करण्यास सांगितला होता.
बुधवारी काही विद्यार्थी महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे अर्ज घेऊन गेले होते पण प्राचाऱ्यांनी फी माफ करण्यात साफ नकार दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना उडवा उडवीची उत्तरे द्यायला सुरुवात केली. शुभम बारोठ या तिसऱ्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने याबाबत विचारणा केली असता प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांनी त्याला खूप खालच्या भाषेत उत्तरे द्यायला सुरुवात केली. ते म्हणाले की, ‘तुम्हाला शिकायचे नसेल तर कॉलेज सोडून द्या, पण फी माफ होणार नाही. तुम्हाला जे करायचं आहे ते करा’.
यानंतर शुभम बारोठ याने त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी त्याचे ऐकले नाही. त्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे मोबाईलही काढून घेतले. शुभमकडे फी भरण्यासाठी पैसे नव्हते कारण आधीच त्याचा आईने त्याच्या फीसाठी दागिने गहाण ठेवले होते आणि फी भरली होती. कोरोनामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होती.
प्राचार्यांनी त्याला खूप खालच्या दर्जाची भाषा वापरल्यामुळे त्याचा खूप मनस्ताप झाला होता. मग त्याने आपला मोबाईल घेतला आणि प्राचार्यांना कॅमेऱ्यामध्ये हे सर्व बोलण्यास सांगितले पण तेव्हा ते शांत बसले आणि त्यांनी शुभमला ऑफिसमध्ये कोंडण्याचा प्रयत्न केला व दरवाजा लावून घेतला.
त्यानंतर शुभमने दरवाजा उघडण्यासाठी त्याला धडक दिली असता त्याची काच फुटली आणि त्याचा डोक्याला आणि हाताला जबर दुखापत झाली. यानंतर तेथील कॉलेज स्टाफमधील काही १५ ते २० लोकांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. तो खूप ओरडत होता पण कोणीही त्याचे ऐकले नाही आणि त्याला खूप वाईट प्रकारे मारहाण केली व शिवीगाळ केली.
एवढं सगळं झालं तरी प्राचार्यांनी त्याला दवाखान्यात नेले नाही आणि बाकीच्या मुलांनाही एका खोलीत डांबून ठेवले. तो रडत होता, ओरडत होता, त्याच्या डोक्यातून आणि हातातून रक्त वाहत होते पण त्यांनी त्याला तसंच बसवून ठेवले आणि पोलिसांमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी सर्व मुलांना चौकीत नेले आणि बसवून ठेवले पण महाविद्यालयावर काहीच कारवाई केली नाही.
त्यानंतर मुलांनी ABVP (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) संपर्क साधला आणि त्यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेतली. शुभमला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि त्याच्यावर योग्य उपचार करण्यात आले. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पिंपरी चिंचवड महानगरमंत्री प्रथमेश रत्नपारखी यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना गोळा केले आणि याच्याविरोधात आवाज उठवला.
