विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई द्या अन्यथा संभाजी ब्रिगेड च्या वतीने ३० सप्टेंबर रोजी तीव्र आंदोलन –
चंद्रशेखर घाडगे
पुणे: आरोग्य विभागातील पद भरतीसाठी २६ सप्टेंबर रोजी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. पण हॉल तिकिटात संबंधित एजन्सीने प्रचंड गोंधळ घातल्याचं समोर आलं होतं. हॉल तिकीटमध्ये अनेक चुका समोर आल्या होत्या. आरोग्य खात्याच्या अधिकारी अर्चना पाटील यांना निलंबित करण्यात यावे, तसेच संबधीत एजन्सीवर कारवाई करून सर्वच विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान भरपाई भरून द्यावी, कारण विद्यार्थी पाचशे किलोमीटर वर परीक्षा केंद्र असल्या कारणाने एक दिवस आधीच परीक्षा केंद्रावर आले होते, ते सर्वच विद्यार्थी शेतकरी, व सर्वसामान्य कुटुंबातील आहेत, म्हणुन त्या सर्व विद्यार्थ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा संभाजी ब्रिगेड च्या वतीने ३० सप्टेंबर रोजी आरोग्य विभागाच्या कार्यालया बाहेर तीव्र आंदोलन करण्यात येईल.असा इशारा संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष,चंद्रशेखर घाडगे यांनी दिला आहे.
चंद्रशेखर घाडगे म्हणाले, आरोग्य खात्याची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीट वेळेवर न मिळणे तसेच कुणाच्या वडिलांचे नाव चुकीचे तर कुणाला थेट उत्तर प्रदेशमध्ये परीक्षा केंद्र मिळाल्याचा प्रकार आरोग्य विभागाच्या परीक्षेत उघड झाला होता. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. आरोग्य विभागाने निष्क्रिय एजन्सीला परीक्षेची जबाबदारी दिलेली आहे, त्या एजन्सीवर कारवाई करावी तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी परीक्षेच्या तारखेत त्वरित बदल करावा.२६ सप्टेंबर ऐवजी पुढच्या आठवड्यातील तारीख घ्यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड चे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी केली होती, अखेर राज्य सरकारने ही परीक्षा तुर्तास रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
