तीन सदस्यीय प्रभागावर पुनर्विचार होऊ शकतो – बाळासाहेब थोरात
पुणे: आगामी महापालिका निवडणूकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग हा मंत्रीमंडळाचा सामूहिक निर्णय आहे. पण त्यात मतमतांतरे असू शकतात, त्यामुळे येत्या बुधवारी मंत्री मंडळाच्या बैठकीत यावर फेरविचार होऊ शकतो असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. काँग्रेस भवनमध्ये पत्रकारांबरोबर संवाद साधतांना त्यांनी ही माहिती दिली. यामुळे आता पुन्हा बुधवारी काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, बहुसदस्य प्रभागांच्या निर्णयावर चर्चा होणे स्वाभाविक आहे, तसेच काही मते वेगळी असणेही शक्य आहे. मंत्री मंडळात निर्णय झाला त्यावेळी एकमतानेच झाला. नंतर यावर झालेल्या चर्चेत काही जणांची मते वेगळी असल्याचे लक्षात आले. त्याचाही विचार व्हायला पाहिजे.
दरम्यान, वीज बिलांची थकबाकी ही वस्तुस्थिती आहे. ती नाकारता येणार नाही. आम्ही त्यावर मार्ग काढणण्याचा प्रयत्न करतो आहोत. काहीही झाले तरी राज्य अंधारात जाऊ देणार नाही, त्यासाठी आम्ही सक्षम आहोत.
