आर्थिकदुरावस्था ओढावल्यांसाठी रोजगाराद्वारे हातभार लावण्याचा प्रयत्न चंद्रकांत पाटील
पुणे:गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे समाजातील सर्वच वर्गाचे प्रचंड नुकसान झाले. अनेकांच्या हातचे रोजगार गेले. अजूनही आपला आर्थिक गाडा म्हणावा तसा रुळावर आलेला नाही. त्यामुळे आर्थिकदुरावस्था ओढावलेल्यांना रोजगाराच्या माध्यमातून हातभार लावण्याचा प्रयत्न केल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. पाटील यांच्या जनसंपर्क कार्यलायात ‘एक हात मदतीचा’ उपक्रमाच्या द्वितीय कर्तव्यपूर्ती कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाला नगरसेवक जयंत भावे, कोथरुड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, पुणे शहर उद्योग आघाडीच्या प्रमुख अमृता देवगांवकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
पाटील म्हणाले, कोरोनामुळे समाजातील सर्वच घटकांचे मोठे नुकसान झाले. अनेकांना आपला हातचा रोजगार गेला. अजूनही यातील काही घटक आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. त्यामुळे आर्थिक दुरावस्था ओढवलेल्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पुणे शहर उद्योग आघाडीच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात आली, असून याचा अनेकांना लाभ झाला. अजूनही आपला समाजाचा गाडा रुळावर आलेला नाही. त्यामुळे आर्थिक दुरावस्था ओढावलेल्यांना मदत करण्याची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, कोरोनामुळे अनेक कुटुंबावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला. पालघर जिल्ह्यातील भाजपाचे 37 कार्यकर्ते कोरोनामुळे गेले. राज्याचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी त्या कार्यकर्त्यांच्या घरी गेलो, त्यावेळी अतिशय वेदनीदायी दृश्ये पाहायला मिळाली. कारण, अनेक कार्यकर्त्यांसह त्यांच्या पत्नींचे देखील कोरोनामुळे निधन झाले होते. त्यामुळे आपण या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहोत. भारतीय जनता पक्ष आपल्या सर्वांच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे, असे यावेळी त्यांनी सर्वांना आश्वस्त केले.
चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून आणि पुणे शहर उद्योग आघाडीच्या माध्यमातून कोथरुडमध्ये एक हात मदतीचा हा रोजगाराभिमुख उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत आर्थिकदुरावस्था ओढावलेल्यांना किमान दोन महिन्यांची रोजगाराची संधी मिळवून देण्यात आली. या सर्वांना त्यांच्या श्रमाचे मानधन पाटील यांच्या माध्यमातून लोकसहभागातून देण्यात आले. तसेच, या सर्वांना दोन महिन्याचा शिधावाटप ही करण्यात आले. या उपक्रमाचा अनेकांना लाभ झाला असून, यापैकी काहीजणांना कायमस्वरुपी रोजगार मिळाला आहे.