Monday, June 15, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

बार्टीला निधी कमी पडू दिला जाणार नाही ही वलग्ना,अत्यल्प निधी मंजूर करणाऱ्या अर्थ विभाग व सामाजिक न्याय मंत्र्यांची भूमिका अनुसूचित जाती विरोधात – वंचित युवा आघाडी.

अकोला  :राज्यभरात रोष निर्माण झाल्या नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ला आज अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या ३०० कोटी पैकी केवळ ९१.५० कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला असून, बार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी सवंग घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे केली असली तरी सहा महिने होऊन देखील केली गेलेली अल्प तरतूद ही आघाडी सरकारची अनास्था स्पष्ट करीत असून वंचित बहूजन युवा आघाडीने ह्या दिरंगाईचा निषेध व्यक्त केला आहे.अत्यल्प निधी मंजूर करणाऱ्या अर्थ विभाग व सामाजिक न्याय मंत्र्यांची भूमिका अनुसूचित जाती विरोधात असल्याचा आरोप देखील युवा आघाडीने केला आहे.

बार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रम व कार्यशाळा आदींसाठी ९० कोटी रुपये तसेच महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक देखभाल समिती साठी दीड कोटी असे एकूण ९१.५० कोटी रुपये आज स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात आले आहेत.

गेली सहा महिने बार्टीच्या योजनांची केली जाणारी दुरावस्था पाहता अनुसूचित जाती मध्ये तसेच समाज माध्यमांमध्ये बार्टीच्या योजना बंद पडणार अशा आशयाच्या साधार बातम्या प्रसिद्ध झाल्या. बार्टीची प्रत्येक योजना तळागाळातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आहे. यांपैकी कोणतीही योजना बंद पडणार नाही, ह्या साठी सामाजिक न्याय मंत्र्यांना घेराव घालण्याचा निर्णय कालच प्रदेश युवा आघाडीने घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला होता.
सरकारने केलेली अल्प तरतूद अनुसूचित जातीच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. सरकारने जाणिवपूर्वक गेली सहा महिने निधी मंजूर करण्यात चालढकल केली आहे. सामाजिक न्यायमंत्री ” घरवाली, बाहरवाली” मालिकेत अडकुन पडल्याने त्यांची धडपड स्वतःचे मंत्रिपद वाचविण्यासाठी सुरू आहे. त्याचा गैरफायदा अनुसूचित जातीचा निधी हडपण्यात माहिर असलेल्या अर्थखात्याचे म्होरके अजित पवार ह्यांनी घेतला आहे. अनुसूचित जाती साठीचा निधी सिंचना साठी वळवून त्यात भ्रष्टाचार करणाऱ्या प्रकरणात भाजपा सोबत उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी करून त्या प्रकरणात क्लीन चीट मिळविली आहे.त्यानंतर आरक्षित वर्गाच्या पदोन्नती मध्ये आरक्षण नाकारले गेले.आता अजित पवारांनी पुन्हा आपला डाव अनुसूचित जातीच्या योजना बंद करून त्यातील तरतूद इतरत्र वळविण्यासाठी टाकला आहे.
वंचित बहूजन युवा आघाडी ह्या विरुद्ध लवकरच ” जवाब दो आंदोलन ” उभे करणार असल्याचा इशारा वंचित बहूजन युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष नीलेश विश्वकर्मा, प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, प्रदेश सदस्य एड सचिन जोरे, शामिभा पाटिल, ऋषिकेश नांगरे पाटील, अक्षय बनसोडे, विशाल गवळी, चेतन गांगुर्डे, रविकांत राठोड, सूचित गायकवाड, अमन धांगे ह्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading