‘नॉलेज इकॉनॉमी’च्या काळात ग्रंथालय, ग्रंथपाल यांची भूमिका खूप मोलाची – प्रकुलगुरू एन. एस. उमराणी
पुणे : प्रत्येक व्यक्ती दोन पद्धतीने जीवन जगत असतो. एक वैयक्तिक व दुसरे सामाजिक आणि या दोन्हीतील दुवा आहे तो म्हणजे सांस्कृतिक जीवन. सांस्कृतिक जीवन समृद्ध होण्यासाठी ग्रंथालयांची आवश्यकता आहे. प्रत्येक यशस्वी व्यक्तिच्या आयुष्यात ग्रंथालयांचे स्थान अनन्यसाधारण राहिले आहे. ‘नॉलेज इकॉनॉमी’च्या काळात ग्रंथालय, ग्रंथपाल यांची भूमिका खूप मोलाची आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू एन. एस. उमराणी यांनी केले. ग्रंथपाल म्हणजे सांस्कृतिक भांडवल निर्माण करणारे समाजशिक्षकच आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त साजर्या केल्या जाणार्या राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाचे औचित्य साधून संवाद पुणे आणि समर्थ युवा फाऊंडेशनतर्फे सहाय्यक ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर, आबासाहेब अत्रे दिन प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील संदर्भ ग्रंथपाल व ग्रंथ प्रसारक प्रसाद भडसावळे, भरत नाट्य संशोधन मंदिराचे ग्रंथपाल मोहन मुळ्ये, पुणे नगर वाचन मंदिराच्या ग्रंथपाल सविता पद्माकर गोकुळे आणि ग्रंथपाल व सूचीकार शिल्पा मिलिंद सबनीस यांना पहिल्या ग्रंथसंदर्भ सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या वेळी प्र कुलगुरू उमराणी बोलत होते. ज्येष्ठ ग्रंथपाल डॉ. शां. ग. महाजन, बालकथा लेखक राजीव तांबे, सुनील महाजन, निकिता मोघे व्यासपीठावर होते. उपरणे, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
उमराणी पुढे म्हणाले, जल, पर्यावरण आणि अर्थविषयक साक्षरतेत आपण खूप मागे आहोत. पर्यावरण बदलाचे दुष्परिणाम समाजला भोगावे लागत आहेत, अशा परिस्थितीत जे उपयुक्त आहे, संयुक्तिक आहे त्याची कास धरणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. शाळांमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार होतो, पण ग्रंथपालांकडे आपण सोईस्करपणे दुर्लक्ष करतो. याविषयीची टोचणी अशा कार्यक्रमातून लागते.
राजीव तांबे म्हणाले, वाचन आपल्याला पाहायला शिकविते आणि त्यासाठी ग्रंथपाल आपल्याला मदत करतो. पाहण्यासाठी उत्सुक करतो. आपल्या पाहण्याची नोंद ठेवतो. मी काय पाहू शकेन हे सांगतो. सूचीकार वाचकाच्या पाहण्याच्या नोंदी ठेवतो. काय पाहिले आहे आणि ते पुन्हा पाहण्यासाठी काय शोधले पाहिजे हे सांगतो. वाचक, ग्रंथपाल आणि सूचीकार हा उत्तम ट्रायो आहे. पुस्तकाचा समग्र विचार करणे महत्त्वाचे आहे. ग्रंथपाल, सूचीकार, मुखपृष्ठकार, चित्रकार यांच्या मनमोकळ्या गप्पा व्हाव्यात अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
