… तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस 30 टक्के ओबीसी उमेदवार देणार – नाना पटोले
नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसींना आरक्षण मिळाले नाही तर, काँग्रेसकडून ओबीसींच्या 30 टक्के उमेदवारांना निवडणुकीचे तिकीट देणार असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. दरम्यान, यापूर्वीच भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थेच्यानिवडणुकीत सर्व ठिकाणी ओबीसी उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले आहे.
पटोले म्हणाले, ओबीसींना राजकीय आरक्षण मिळेल की नाही याबाबत संभ्रम आहे. आरक्षण मिळाले नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस ओबीसींना 27 टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे 30 टक्के उमेदवारांना तिकीट देणार आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा देखील असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना पाटोले म्हणाले, काँग्रेसने देशात स्वातंत्र्य लढा उभारला. देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. पण आज ओबीसी समाजायला आपल्या हक्काची लढाई लढावी लागत आहे. आपण एकत्रित नसल्याने आपल्याला आपले अधिकार मिळत नाहीये. ताटं वाजवणाऱ्यांनी कधीही आपला विचार केला नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
राज्यात 28 ऑगस्टला सोनिया गांधी, राहूल गांधीची सभा
28 ऑगस्ट हा काँग्रेसचा स्थापना दिवस आहे. त्या निमित्ताने सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांची सभा व्हावी, ही राज्यभरातील नेत्यांची इच्छा होती. त्यामुळे ही सभा राज्यात घेण्याचे नियोजन केले आहे, असेही पाटोले यांनी सांगितले.
