जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांमध्ये १२ वी च्या निकालात मुलींची बाजी
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट संचलित जय गणेश ज्ञानवर्धन अभियानांतर्गत जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेमधील इयत्ता बारावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. योजनेंतर्गत हुजूरपागा कॉमर्स मध्ये शिकणारी मेघना भुवड ही ८९.३३ टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे.
जय गणेश पालकत्व योजनेतील आणखी ४ विद्यार्थ्यांनी ८० टक्के पेक्षा पुढे गुण मिळविले असून ९ विद्यार्थ्यांनी ७० टक्के पेक्षा जास्त गुण मिळविले आहेत. वाणिज्य शाखेत ११, विज्ञान शाखेत ४, कला शाखेत १ आणि व्होकेशनलमध्ये २ विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत आहेत.
गरवारे कॉमर्समधील मिताक्षी बागुल हिला ८४.८३ टक्के, एस.पी.कॉमर्समधील श्रुती मारणे हिला ८४.३३ टक्के, सिंबायोसिस कॉमर्समध्ये शिकणा-या श्रेया सोनकुल हिला ८३.८३ टक्के, मॉडर्न कॉमर्समधील प्रतिक्षा मळेकर हिला ८२.६६ टक्के गुण मिळाले आहेत. याशिवाय मिथिला शहा, नेहा कांबळे, कल्याणी शिवले, आदिती केंगार, रत्नाली दुधगी, गौरव दरेकर, शुभम पाडेकर, कल्याणी मेहेंदळे, पूजा बामणे यांना ७० टक्के पेक्षा अधिक आणि आदित्य नाईकनवरे, अनिरुद्ध दोरगे, ॠषिकेश अवघडे, भुमिका माजगणकर यांना ६० टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.
मेघना भुवड हिचे वडिल खासगी ठिकाणी नोकरीला असून आई गृहिणी आहे. मेघनाला पुढे सीएस व्हायचे असून ती त्यादृष्टीने तयारी करीत आहे. तर, मिताक्षी बागुल हिचे वडिल रिक्षाचालक असून आई गृहिणी आहे. दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या मदतीने तिने सीए करीता प्रवेश घेतला आहे. फाऊंडेशनची तिची तयारी सुरु असून तिला पुढे सीए व्हायचे आहे.
ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, इयत्ता १० वी आणि १२ वी हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे असतात. त्यामुळे याकाळात त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहून योग्य दिशा दाखविणे आणि मार्गदर्शन व मदत करणे आवश्यक असते. यादृष्टीने जय गणेश ज्ञानवर्धन अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कार्य सुरु आहे. इयत्ता १२ वी मध्ये उत्तम यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे विश्वस्तांनी अभिनंदन केले असून यापुढेही विद्यार्थ्यांना मदत देण्यास ट्रस्ट तत्पर असेल.