पन्नास टक्के शालेय फी कपातीची लोकजनशक्ती पार्टीची मागणी
पुणे : ऑनलाईन शिक्षण आणि कोविड परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शालेय फीमध्ये महाराष्ट्रात सवलत देऊन पन्नास टक्के शालेय फी माफ करावी, अशी मागणी लोकजनशक्ती पार्टीने केली आहे.
गेले दीड वर्षे पालक शाळा फी सवलत / कपात मागणी करीत आहेत. या प्रकारची फी कपात दिल्ली सह राजस्थान, मध्यप्रदेश, तामिळनाडू व इतर अनेक राज्यात दिली गेली आहे. शैक्षणिक फी मध्ये ही सवलत देण्याचे आदेश दिल्ली सरकारने खाजगी शाळांना दिले आहेत.
लोकजनशक्ती पार्टीचे पुणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट यांनी पत्रकाद्वारे ही फी कपातीची मागणी केली आहे.यावेळी पुणे शहर जिल्हा सरचिटणीस के.सी.पवार, उपाध्यक्ष संजय चव्हाण, सरचिटणीस अनिल हातागळे, संघटक आप्पा पाटील, गायक अमर पुणेकर, महिला संघटिका रजियाताई खान, कुसुमताई दहिरे, त्रिभुवन , लीगल सेलचे अध्यक्ष अॅड.अमित दरेकर, पर्वती विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष बाळासाहेब मोहिते, उपाध्यक्ष संजय शेलार, शिरुर मतदार संघाचे अध्यक्ष शरद टेमगिरे, बंडू वाघमारे, शुभम आल्हाट, पिंटू भोसले व आदित्य आल्हाट उपस्थित होते.
सत्ताधारी महाविकास आघाडी आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजप यांनी नफेखोर शिक्षण संस्थांच्या बाजूने उभे राहू नये, पालकांच्या बाजूने उभे राहावे, असे लोकजनशक्ती पार्टीच्या निवेदनात म्हटले आहे.
गेले दीड वर्ष पालक अनेक समस्यांना तोंड देत आहेत. मागील वर्षी लॉकडाऊन काळात खाजगी शाळांनी खर्च बचत होऊनही फी कमी केली नाही तसेच महाराष्ट्र सरकारने काढलेल्या ढिसाळ आदेशाला कोर्टात आव्हान दिले गेल्यावरच्या कोर्ट निर्णयामुळे पालकांना काहीच दिलासा मिळाला नाही. दरम्यान राजस्थान सरकार विरुद्ध जोधपुर येथील खाजगी शाळा या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्वपूर्ण निर्णय दिनांक ३ मे रोजी दिला आहे. हा निर्णय अनेक दृष्टीने महत्वाचा आहे. या निर्णयामुळे शिक्षण हक्क संबंधित महत्वाच्या मुद्यांना दुजोरा मिळाला असून फी कमी करण्याबाबतच्या मागणीला वैधता मिळाली आहे. या न्यायालयीन निर्णयाच्या अनुशंगाने महाराष्ट्रात नवा अध्यादेश काढण्याची गरज आहे , असे संजय आल्हाट यांनी सांगितले.
