Mumbai Rain – चेंबूर, विक्रोळी आणि भांडुप मधील दुर्घटनामध्ये एकूण ३१ जणांनी प्राण गमावले
मुंबई : मुसळधार पावसामुळे रविवारचा संपूर्ण दिवस मुंबईकरांसाठी वाईट गेला. एका रात्रीत विविध ठिकाणी दुर्घटना घडल्याने ३१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. चेंबूर येथील दुर्घटनेतील बचावकार्य सायंकाळी संपले असून येथे २१ नागरिकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. तर 2 जणांवर उपचार सुरू आहे. तर, विक्रोळी येथे दुमजली इमारत कोसळून घडलेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे.
NDRF ने दिलेल्या माहितीनुसार, चेंबूर येथे दिवसभर बचावकार्य सुरू होतं. आता संध्याकाळी ते संपले आहे. आतापर्यंत 21 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्याचबरोबर आता 2 जणांना राजावाडी हॅास्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पाऊस सुरू असल्यामुळे मदतकार्य आणि रेस्क्यू ॲापरेशन करण्यास अडथळा येत होता. मात्र अखेर ॲापरेशन आता संपलेल आहे, अशी माहिती आशिष कुमार यांनी दिली. तसंच, घटनास्थळी अजूनही धोका कायम आहे. त्यामुळे काही जणांना स्थलांतरीत केले आहे.
चेंबूरच्या भारत नगर परिसरात एकूण तीन घरांवर झाड आणि संरक्षक भिंत पडून घरांचे नुकसान झाले आहे. मध्यरात्री 12.30 ते 1 च्या सुमारास हा प्रकार घडला. दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली होती. मध्यरात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराच्या पायथ्याशी बांधलेली भिंत ५ ते ८ घरांवर कोसळली आणि मलब्याखाली या घरांमध्ये राहणारे लोक दबले गेले
विक्रोळीमध्ये एक दुमजली इमारत कोसळून १० जणांचा मृत्यू झाला आहे. विक्रोळीतील (Vikhroli) पंचशील नगर भागात दरड कोसळल्यानं ही दुर्घटना घडली आहे. तर, भांडुपच्या अमरकोट भागामध्ये वनविभागाची भिंत कोसळल्याने सोहम थोरात नावाच्या १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, मुंबईतील तीन ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमधील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारने २ लाखांची आर्थिक मदत जाहीर केली असून ,राज्य सरकारने ५ लाखांची मदत जाहीतर केली आहे. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
