लस मिळाली तर दोन महिन्यात सर्वांचे लसीकरण – राजेश टोपे
जालना : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्वाचं लसीकरण करण्याचं उद्दीष्ट आहे. पण मुबलक लस पुरवली तर येत्या दोन महिन्यांत राज्याचं लसीकरण पूर्ण होऊ शकेल असा विश्वास राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.
दिवसाला 10 ते 15 लाख लोकांच्या लसीकरणाची राज्याची क्षमता असून केंद्राने सतत लस पुरवल्यास दोन महिन्यात महाराष्ट्राचे लसीकरण पूर्ण होईल, असा दावा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. राज्यात काल एका दिवसात 7 लाखांपेक्षा अधिक लसीकरण करून उच्चांक स्थापित केला आहे.
तसेच कोरोनी टेस्टिंगविषयी बोलताना राजेश टोपे म्हणाले की, यापुढे अँटीजन टेस्टनुसार नाही तर आरटीपीसीआर टेस्टनुसारच पॉझिटिव्हीटी रेट काढण्यात येणार आहे. यापुढे अँटीजन पॉझिटिव्हिटी रेटसाठी गृहीत धरणार नसल्याचे यांनी म्हटलंय. दरम्यान निर्बंध हे फार साधारण असून ते गरजेचे असल्याचे सांगत राजेश टोपे यांनी परिस्थिती नियंत्रणात आल्यावर यावर योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
