काँग्रेस शिवाय देशात भाजप विरोधी आघाडी होणं अशक्य – संजय राऊत
जळगाव – राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात बैठक झाल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. या भेटीनंतर आता देशात विरोधकांकडून भाजप विरोधात नवी आघाडी तयार करण्याची रणनीती आखली जात असल्याचीही जोरदार चर्चा रंगत आहे. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षाबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.
संजय राऊत हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. शिवसेना पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी संजय राऊत हे आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहेत. जळगाव जिल्ह्यातील पुढील खासदार हा शिवसेनेचा असावा यासाठी रणनीती आखली जात आहे.
नरेंद्र मोदींना पर्याय म्हणून विरोधकांकडून चाचपणी केली जात आहे का? या प्रश्नावर संजय राऊत यांनी म्हटलं, देशाचा विचार केला तर काँग्रेस पक्ष सध्या काहीसा कमकुवत वाटत असला तरी काँग्रेस पक्षाशिवाय कोणतीही प्रमुख आघाडी होण अशक्य आहे. कारण काँग्रेस हा जुना पक्ष आहे आणि आजही त्याची अनेक राज्यांमध्ये चांगली पकड असल्याचं दिसून येते. भक्कम विरोधी पक्ष उभारणीसाठी सर्वच प्रादेशिक पक्षांची मजबूत आघाडी होणे गरजेचे असल्याची आपली नेहमीच मागणी राहिली आहे.
संजय राऊत म्हणाले, प्रशांत किशोर हे काही कुठल्या राजकीय पक्षाचे नेते नाहीत. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांनी आमच्यासाठी काम केले आहे, काँग्रेससाठी काम केले आहे. त्यांच्यासोबत अनेक राजकारण्यांच्या भेटी होत असल्या तरी त्या पक्षाच्या विस्ताराच्या संदर्भात होऊ शकतात. त्यामुळे प्रशांत किशोर हे शरद पवार यांना भेटल्याने कोणतीही राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता नाही.
