1 जूननंतरच्या लॉकडाऊनबाबत विजय वडेट्टीवार काय म्हणाले; जाणून घ्या
मुंबई -राज्यात कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. हा लॉकडाऊन 1 जून सकाळी सात वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे 1 जून राज्यात लॉकडाऊनची कशी स्थिती असेल लॉकडाऊन संपेल की वाढेल असे प्रश्न जनतेला पडू लागले आहेत. दरम्यान राज्यातील लॉकडाऊन संदर्भात राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी निर्बंध शिथिल संकेत दिले.
राज्यात सध्या 14 जिल्हे रेड झोनमध्ये असून रुग्णांचा आकडा बघून लॉकडाऊनसंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. येत्या 5 ते 6 दिवसात राज्यात काय परिस्थिती असेल याचा आढावा घेऊनच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली. तसंच रेड झोन असलेल्या जिल्ह्यातल्या कोरोना स्थितीचा आठवड्याभरात आढावा घेण्यात येईल. त्यानंतर जिल्हानिहाय त्यासंदर्भातले निर्णय घेण्यात येतील. रेड झोनमधल्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा कमी झाला नाही तर कडक लॉकडाऊन काय राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
मुंबईत लोकल बंद असल्यामुळे कोरोनाचा आकडा कमी झाला आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु आहे आणि त्याचा परिणाम दिसून येतोय. मुंबई लोकलवर आणखी काही दिवस निर्बंध लावणं आवश्यक आहे. सरसकट सूट दिली तर पुन्हा गर्दी होईल. त्यामुळे गर्दी कमी करण्यासाठी आणखी 15 दिवस तरी लोकल सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरु करता येणं शक्य नसल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
