स्वयंसेवी संस्थानी शासकीय योजना व सामान्य नागरिक यांच्यात दुवा म्हणून काम करावे -देवेंद्र फडणवीस
पुणे : स्वयंसेवी संस्थांनी शासकीय योजना व सामान्य नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करणे गरजेचे आहे. तसेच लोक कल्याणकारी उपक्रम व खरे लाभार्थी यांच्यातील अंतर कमी करण्याचे काम सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून घडावे, ही अपेक्षा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
महा एनजीओ फेडरेशनच्या कोरोनाजन्य परिस्थितीत केलेल्या सेवा कार्य अहवालाचे प्रकाशन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे झाले. यावेळी महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा, सहसंस्थापक विजय वरूडकर, संचालक मुकुंद शिंदे,गणेश बाकले, अक्षय महाराज भोसले, अमोल उंबरजे, शशांक ओंबासे उपस्थित होते.
यावेळी महा एनजीओ फेडरेशनच्या विविध सेवा उपक्रमाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर फेडरेशन द्वारे सुरू असलेल्या आत्मनिर्भर ग्राम अभियान, रोजगार निर्मिती या उपक्रमांना तसेच पुढील वाटचालीसाठी देवेंद्र्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले.
शेखर मुंदडा म्हणाले, संपूर्ण जग कोरोनाग्रस्त असताना प्रशासन, डॉक्टर, पोलीस कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थांनी देखील अनेक सेवा उपक्रम राबविले. महा एनजीओ फेडरेशनतर्फे व आर्ट आॅफ लिव्हिंग, आय.ए.एच.व्ही, माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ आणि इतर २०० पेक्षा अधिक स्वयंसेवी संस्थांच्या सहयोगाने ३ लाख पेक्षा अधिक नागरिकांना मदत देण्यात आली.
विजय वरुडकर म्हणाले, अन्न धान्य किट, फेसशिल्ड, मास्क, पीपीई किट, खाद्य पदार्थ, आयुर्वेदिक काढा, सुदर्शन क्रिया प्रशिक्षण, रक्तदान शिबिरांचे आयोजन, सेवा सप्ताह, आत्मनिर्भर दिवाळी, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त व पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त आयोजित सेवा उपक्रम व इतर उपक्रमांची माहिती असणारा हा कार्यवृत्तांत आहे. त्याचप्रमाणे सन २०१७ पासून आज पर्यंत केलेल्या सेवा कार्याचा आढावा यामध्ये घेण्यात आला आहे. यापुढेही असेच सेवाकार्य सुरु राहणार आहे.