परभणी – लॉकडाऊन नको; व्यापार्यांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
परभणी, दि. 24 – कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने 31 मार्चपर्यंत लागू केलेल्या संचारबंदीस शहरातील छोट्या-मोठ्या व्यापार्यांसह उद्योजकांनी तीव्र विरोध दर्शवुन तो निर्णय मागे घ्यावा, यासाठी बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकार्यांना साकडे घातले.
गेल्या वर्षभरापासून शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठा पूर्णतः कोलमडलेल्या आहेत. छोटे-मोठे विक्रेते, व्यापारी, उद्योजक अक्षरशः हैराण आहेत. आर्थिकदृष्ट्या डबघाईस आले आहेत. दैनंदिन व्यवहार सांभाळणेसुध्दा मुश्कील बनले असून त्यामुळे विक्रेते, व्यापारी व उद्योजकांसमोर नानाविध प्रश्न उभे राहिले आहेत. त्यातून कसबसे सावरण्याचे प्रयत्न सुरू असताना प्रशासनाने पुन्हा संचारबंदी लागू करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे व्यापारीपेठा, सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन ठप्प होणार आहे. विस्कळीत होणार आहे. प्रशासनाने एकंदरित गंभीर स्थिती ओळखून या संवेदनशील स्थितीत मार्ग काढावा, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कठोरपणे अंमलबजावणी करावी, परंतु लॉकडाऊन, संचारबंदीसारखे निर्णय घेऊन व्यवहार पूर्णतः ठप्प करू नये, अशी विनंतीही या मंडळींनी जिल्हाप्रशासनास केली.
अन्य जिल्ह्यात एवढ्या कठोरपणे निर्णय घेतल्या गेले नाहीत, मोठ्या प्रमाणावर सूट देण्यात आली आहे, याकडेही लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी या व्यापार्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
