Thursday, June 18, 2026
MAHARASHTRAPUNE

व्हाटसअप , फेसबुक पिढीला केवळ नेहरू-गांधी घराण्यांची “घराणेशाही” एवढाच शब्द माहीत आहे – कुमार केतकर यांची टीका

पुणे, दि. 21 – त्यावेळच्या नरेंद्र मोदी सदृश हुकूमशाही प्रवृत्तींना अटकाव होऊ करण्याच्या दृष्टीने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना 1975 मध्ये आणीबाणी लागू करावी लागली, असे मत ज्येष्ठ पत्रकार, खासदार कुमार केतकर यांनी व्यक्त केले.
‘राजीव गांधी स्मारक समितीच्या’वतीने स्व. इंदिरा गांधी यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त “ऑनलाइन व्याख्यान सत्राचे” आयोजन केले होते, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ भालचंद्र मुणगेकर, इतिहासाचे अभ्यासक एड. राज कुलकर्णी यांनी सहभाग घेतला. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष गोपाळ तिवारी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

कुमार केतकर म्हणाले, वाटसआप, फेसबुक पिढीला केवळ नेहरू-गांधी घराण्यांची “घराणेशाही” एवढाच शब्द माहीत आहे. मात्र त्यांनी काय आव्हाने पेलली, कोणत्या परीस्थितीत निर्णय घेतले, याची फारशी माहिती दिसत नाही. देशाला 1962, 1965 तसेच 1972 मध्ये युद्धांना सामोरे जावे लागले. यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती खालावली होती. त्यातच 1972 च्या सुमारास देशभर भयंकर दुष्काळ पडला. अन्नधान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. अशा अनेक समस्यांना पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधींना सामोरे जावे लागले
केतकर यांनी आपल्या भाषणात पुढे सांगितले कि, अन्नधान्य टंचाईमुळे भारताला इतर देशांकडे अन्नधान्याची मदत मागावी लागत होती. त्यामुळे भिकारी देश म्हणून जगभर भारताची अवहेलना होत होती. त्याचबरोबर खलिस्तानवादी दहशतवादाला नुकतीच सुरुवात झाली होती. देशाच्या सार्वभौमत्त्व व धर्मनिरपेक्षतेसाठी इंदिरा गांधी शेवटपर्यंत झटल्या. त्यामुळेच त्या ‘दहशतवादी शक्तींनी’ त्यांचा खून केला.
डॉ. मुणगेकर म्हणाले,”” इंदिरा गांधी हे भारतीय राजकारणातील अतिशय वादग्रस्त व्यक्तिमत्व होते. 20 व्या शतकाच्या उत्तरार्धातील जागतिक नेत्यांचा विचार केला, तर इंदिराजी या त्यावेळच्या खऱ्या स्टेटसमन होत्या. त्यांनी अनेक आव्हानांना समर्थपणे पेलले आहे. डॉ भालचंद्र मुणगेकर म्हणाले, इंदिरा गांधी यांची केवळ इमर्जन्सी एवढीच ओळख नव्हती. त्या “स्टेट पर्सन” होत्या. मुंबई ही महाराष्ट्रामध्ये समाविष्ट होण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. डॉ भालचंद्र मुणगेकर यांनी इंदिरा गांधीनी घेतलेल्या अनेक निर्णयांचा आढावा घेतला. तत्कालीन आर्थिक आणि राजकीय परिस्थितीला तोंड देण्याच्या हेतूने त्यांनी गरीबी हटाव हा नारा देऊन २० कलमी कार्यक्रम जाहीर केला. १९७१ चे युद्ध हे इंदिरा गांधींच्या सर्वोच्च राजनीति मधील मुत्सद्दीपणाचा विजय होता असे त्यांनी सांगितले. १९७४ चा पोखरण येथील आण्विक बॉम्बचा प्रयोग याचा विचार करता संरक्षण सिद्धता असणाऱ्या राष्ट्रीय नेत्या होत्याच मात्र भारताचे सौरभौमत्व अबाधित राखण्याचे हेतूने कणखर भूमिका घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय नेत्या होत्या असे सांगितले.
समितीचे अध्यक्ष गोपाळदादा तिवारी यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषणात अशी व्याख्यानें आयोजित केल्यामुळे नविन पिढीस सत्य ईतिहास व ‘देशाच्या जडण घडणीतील राष्ट्रीय नेत्यांचे योगदान’ माहीत व्हावे हाच असल्याचे सांगितले.


श्रीमती इंदिराजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारताची उल्लेखनीय प्रगतीच झाल्याचे प्रतिपादन विधान परिषदेच्या उप – सभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी अध्यक्षीय व्यख्यानात केले. भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या काळ हा जागतिक स्तरावर व देशाअंतर्गत खूप आव्हानात्मक होता. या कालावधीत राजकीय व आर्थिक विविध मतप्रवाह होते. त्यामुळे राजकीय समीकरणे सुद्धा वेग-वेगळी होत होती. त्यांचा कार्यकाळ हा धाडसी, प्रेरणादायी आणि लोकांच्यावर प्रचंड प्रभाव असणार होता. मा. बाळासाहेब ठाकरे यांनी 31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिराजींच्या हत्येनंतर काढलेले चित्र खूप बोलके होते. राष्ट्रपती प्रतिभाताई व मुखर्जी या दोन्ही काँग्रेसच्या राष्ट्रपतींना हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेतर्फे मदत केली. यामागे चांगली माणसे मोठी व्हावी असा होता. भारतरत्न इंदिरा गांधी यांनी संयुक्त महाराष्ट्र स्थापन करण्यासाठी १९५९ झाली काँग्रेस कार्यकारणीमध्ये केलेला ठराव, तसेच बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि जमिनीच्या सुधारणा कायदे यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नाहीत. अंतरराष्ट्रीयस्तरावर भारताची राजनैतिक प्रतिमा उंचावली असे डॉ गोऱ्हे यांनी सांगितले.
सुरुवातिच्या व्याख्यानामध्ये इतिहास अभ्यासक एड राज कुलकर्णी यांनी इंदिरा गांधींच्या विचारावर पंडित जवाहरलाल नेहरूच्या विचाराचा पगडा होता, याबाबत पंडित नेहरू व इंदिरा गांधी यांच्यामधील अनेक पत्रांचा उल्लेख केला. दोघांच्या मधील पत्रव्यवहार हा ऐतिहासिक ठेवा आहे असे सांगितले. ‘पिता व लेकीचे’ नात्याचे पैलू उलगडतांना इंदिराजींच्या व्यक्तिमत्वास ‘स्वावलंबी व कर्तव्य तत्पर नेतृत्व गुणांचे संस्कार’ हे पंडित नेहरूंच्या मुळे मिळाले असेहि एड राज कुलकर्णी यांनी सांगितले. त्यांना फ्रेंच,जर्मन इटालियन अशा आंतरराष्ट्रीय भाषा शिकण्यास संदर्भात पंडित नेहरूंनी प्रोत्साहन दिले. इंदिरा गांधींनीही पंडित नेहरूंना अनेक पत्रे लिहिली आहेत. या पत्राच्या वरून या दोघांमधील वैचारिक आदान-प्रदान समजते. तसेच इंदिराजींना आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास असावा तसेच जगामध्ये घडत असलेल्या प्रत्येक गोष्टीची माहिती असावी याबाबतचा पंडित नेहरूंचा आग्रह होता हे नक्कीच समजते. त्यामुळे इंदिरा गांधी काही प्रसंगी कठोर प्रशासक तसेच ‘मुत्सद्दी राजकारणी’ म्हणून घडण्यामध्ये मोलाचा वाटा होता असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समितीचे अध्यक्ष गोपाळदादा तिवारी यांनी केले संस्थेचे सदस्य व अभिनव शिक्षण संस्थेचे स्स्थापक अध्यक्ष राजीव जगताप यांनी आभार प्रदर्शन करतांना स्व रामकृष्ण मोरे सरां कडून मिळालेले ‘राष्ट्र भावनेचे’ संस्कार आंम्हास असे कार्यक्रम घेण्याची प्रेरणा देते असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading