नीरजा बिर्ला आणि अमिताभ बच्चन यांचा मानसिक आरोग्यासाठी राष्ट्रव्यापी अभियानामध्ये सहयोग
एम्पॉवरच्या संस्थापिका व अध्यक्ष नीरजा बिर्ला व दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी देशात मानसिक आरोग्यविषयीच्या वाढत्या समस्यांची दखल घेत त्यांच्या निवारणासाठी एकत्र येऊन पावले उचलली आहेत. एम्पॉवरच्या युट्युब, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजेसवर श्रीमती बिर्ला व श्री बच्चन यांच्या दरम्यानचा संवाद एका व्हिडिओच्या रूपाने आज प्रकाशित करण्यात आला आहे. यामध्ये या दोन दिगज्जांनी मानसिक आरोग्याशी संबंधित कटू वास्तव आणि त्यामुळे लोकांसमोर उभी ठाकणारी आव्हाने याबाबत तसेच ही परिस्थिती हाताळण्यासाठी समाज कोणती पावले उचलू शकतो याबाबत चर्चा केली आहे. दर्शकांना साधार प्रतिसाद देण्यासाठी या संभाषणात अतार्किक, अनाठायी भीती आणि चिंता यातील फरक स्पष्ट करण्यात आला आहे, अनाठायी भीतीमुळे नेहमीची कामे करण्यात अडथळा येऊ लागण्याआधीच त्यावर नियंत्रण कसे मिळवावे याचीही चर्चा यामध्ये करण्यात आली आहे.
#SunoDekhoKaho हा विचारच मुळात अतिशय सुंदर आहे. सुनो – जेव्हा एखाद्याला गरज असते तेव्हा त्याचे म्हणणे ऐकून घ्या, देखो – आजारपणाची लक्षणे दिसत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि त्यामुळे त्रासलेल्या व्यक्तीकडे लक्ष द्या, कहो – दुसऱ्याला मदत करा, माहिती पसरावा, मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करा. #SunoDekhoKaho या संकल्पनेला अनुसरून श्रीमती बिर्ला व श्री बच्चन यांनी मानसिक आजार ओळखता यावेत, त्यांची लक्षणे कळून यावीत यासाठी शिक्षण किती महत्त्वाचे आहे ते अधोरेखित केले आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून कॉर्पोरेट व्यावसायिकांपर्यंत, कलाकारांपासून राजकारण्यांपर्यंत कोणाच्याही वरवर दिसणाऱ्या चेहऱ्यामागे कोणकोणत्या घडामोडी चाललेल्या असतील आणि कोणाला किती काय सहन करावे लागत असेल कोणीच सांगू शकत नाही. ‘खुलेपणाने बोलणे‘ हा जणू काही गुन्हाच आहे अशा मनोवृत्तीविषयी देखील बोलणे झाले आणि जागरूकता निर्माण करणे किती गरजेचे आहे ते सांगण्यात आले आहे. खासकरून जे शारीरिक छळणुकीमुळे आणि मादक द्रव्यांच्या सेवनामुळे मानसिक आजारांना बळी पडू शकतात अशांना जागरूक करणे निकडीचे असल्याचे या संभाषणात सांगण्यात आले आहे.
या संभाषणात पुढे या दोन दिग्गजांनी मानसिक आरोग्यविषयीच्या काही सर्वसामान्य गैरसमजांविषयी देखील चर्चा केली आहे. यापैकी सर्वात मोठा गैरसमज म्हणजे मानसोपचार न परवडण्याजोगे असतात आणि म्हणूनच कित्येक लोकांना त्यांची गरज असूनही ते त्याकडे वळत नाहीत. श्रीमती बिर्ला यांनी यावेळी सांगितले की एम्पॉवरच्या आजवरच्या प्रवासात त्यांनी समाजातील अनेक स्तरातील अनेक लोकांना सल्ला सेवा दिल्या आहेत जेणेकरून मानाने जगण्याची संधी कोणाकडूनही हिरावून घेतली जाऊ नये.
बच्चन यांच्यासोबत सहयोगाबद्दल एम्पॉवरच्या संस्थापिका व अध्यक्षा नीरजा बिर्ला यांनी सांगितले, “भारतीयांना आपल्या दैनंदीन जीवनात ज्यांचा सामना करावा लागतो अशा आरोग्यविषयीच्या अनेक समस्यांबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या कामात बच्चन गेली बरीच वर्षे सहयोग देत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना विनंती केली की मानसिक आरोग्यासारख्या कलंक मानल्या जाणाऱ्या विषयावर चर्चा करण्यासाठी, जागरूकता निर्माण करण्यासाठी ते आमची मदत करू शकतील का आणि त्याला त्यांनी अतिशय उत्साहाने तयारी दर्शवली. मानसिक आरोग्याची महती सांगणाऱ्या या अभियानासाठी बच्चन यांचे सहकार्य आम्हाला मिळत आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे. अतिशय संवेदनशील आणि आपल्या समाजात खोलवर रुजलेल्या या विषयावर चर्चा करण्यासाठी त्यांच्यासारखे दिग्गज व्यक्तिमत्व पुढे आले आहे ही अभिमानाची बाब आहे. मानसिक आरोग्याच्या समस्येकडे जास्तीत जास्त लोकांचे लक्ष वेधणे ही आज काळाची गरज बनली आहे आणि बच्चन यांचा प्रभावी आवाज त्यासाठी खूप मोलाचा ठरेल. आज आपण ज्या आव्हानात्मक आणि स्पर्धात्मक युगात रहात आहोत त्यामध्ये मानसिक आरोग्याबद्दल चर्चा करणे आणि हा विषय सर्वांसमोर मांडणे खूप महत्त्वाचे आहे. #SunoDekhoKaho मध्ये आम्ही नागरिकांना शिक्षित करून भारतात मानसिक आरोग्य सेवांच्या उपलब्धतेबद्दल जागरूक करू इच्छितो. आम्हाला आशा आहे की श्री बच्चन हा विषय मांडत आहेत, त्यांच्या प्रभावामुळे आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय नेऊ शकू आणि मानसिक आरोग्याशी निगडित गैरसमज, कलंक दूर करण्यात यशस्वी होऊ.”
