समाजाला साहित्याभिमुख बनविण्यात वृत्तपत्रांचे मोठे योगदान – प्रा. मिलिंद जोशी
पुणे – वृत्तपत्रांच्या पुरवण्यांनी विविध प्रकारच्या साहित्यनिर्मितीला चालना मिळावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. आजही मराठी साहित्य विश्वात अनेक महत्त्वाची पुस्तके पुरवण्यांमधल्या स्तंभलेखनातील लेखांच्या संकलनातून निर्माण होतात. समाजाला साहित्याभिमुख बनविण्यात वृत्तपत्रांचे मोठे योगदान आहे. असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने लेखक व संपादक रा. अ. कुंभोजकर स्मृती पुरस्कार दैनिक केसरीचे कार्यकारी संपादक निखिल गजेंद्रगडकर यांना प्रा. जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे,कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, मीना भडेसगावकर उपस्थित होत्या.
प्रा. जोशी म्हणाले, ‘शब्दांच्या ताजवेतोल वापराबाबतचे गांभीर्य दिवसेंदिवस प्रसार माध्यमांत कमी होताना दिसत आहे. संपादकाकडे वैचारिक शिस्त आणि व्यासंग असणे गरजेचे आहे. वृत्तपत्राच्या पुरवण्या पूर्वी साहित्यकेंद्री होत्या आता त्या तशा राहिल्या नाहीत.’
गजेंद्रगडकर म्हणाले. ‘वृत्तपत्रात संपादकाला एका चौकटीत सर्जनशीलता जपावी लागते. दर्जेदार मजकूर ठराविक वेळेत तयार करावा लागतो. दैनिक केसरीमध्ये काम करत असताना अनेक ज्येष्ठ संपादकांच्या सहवासात खूप काही शिकायला मिळाले. विविध क्षेत्रातील खूप मोठी माणसे जवळून पाहायला मिळाली. पत्रकारितेतल्या अनुभवांमुळे माझे जीवन समृद्ध झाले.’ प्रकाश पायगुडे यांनी प्रास्ताविक केले. सुनिताराजे पवार यांनी आभार मानले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.
