तेजस्विनी पंडितने कोरोना काळात मृतांना अग्नी देणा-या unsung heros ना केली मानवंदना
कोरोना काळात कोरोना झालेल्या रुग्णाशी संपर्कात आल्यास आपल्यालाही कोरोना होण्याची भीती प्रत्येकाला आहे. कोरोना झालेली व्यक्ती मृत्यू पावल्यासही हा धोका आहेच. अशावेळी सुरुवातीच्या काळात तर कोरोना बाधित मृतांना नातेवाईकांना न देताच थेट दहनासाठी स्माशानभूमीत न्यावे लागत असे.अशावेळी अनेक स्वयंसेवकांनी, स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी, शवगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बऱ्याच मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले होते आणि अशा ‘अनसंग हिरोज’ना अभिनेत्री तेजस्विनी पंडितने अष्टमीच्या दिवशी आपल्या इलस्ट्रेशन फोटोव्दारे आदरांजली अर्पण केली आहे.
अभिनेत्री तेजस्विनी पंडित म्हणते, “आता पीपीई किट, मास्क, ऑक्सिमीटर उपलब्ध होऊ लागले आहेत. पण कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात मृतांचा आकडा जास्त होता. तेव्हा नातेवाईकांनाही मृतांच्या जवळ जाण्याची परवानगी नव्हती. अशावेळी नागेश वाघमारेंसारखे स्वयंसेवक अग्नी देण्यासाठी धावून आल्याची बातमी पाहिली. त्याचप्रमाणे सुनीता पाटील ह्यांच्यविषयीही वाचलं. मला अशा स्वयंसेवकांविषयी कमालीचा आदर वाटतो. आपल्याला ह्यातून काहीच फायदा नाही, किंबहुना ह्याने आपल्याला कोरोना होऊ शकतो हे माहित असताना त्यांनी दाखवलेलं माणुसकीचं दर्शन वाचल्यावर मन दाटून आलं आणि ह्यांना आपोआपच मनोमन सलाम ठोकला. म्हणूनच अष्टमीला त्यांना वाहिलेली ही आदरांजली आहे.”
तेजस्विनी पंडित पुढे सांगते, “मृतदेहाला अग्नी देणे, खूप महत्वाचे मानले जाते. इथून मोक्षप्राप्तीची वाट सुरू होते, असं म्हणतात. पण कोरोना काळात मृतव्यक्तीसाठी अश्रू ढाळणारे नातेवाईक त्याला खांदा देऊ शकत नव्हते. आपल्या जवळच्या व्यक्तीला शेवटचा निरोपही देऊ शकत नव्हते. ही मन विष्षण्ण करणारी घटना…. आणि अशावेळी काही स्वयंसेवक, किंवा स्मशानभूमीत काम करणारे कर्मचारी हे ‘दैवी’ कर्म कोणत्याही फळाची अपेक्षा न करता निभावतात. ही नक्कीच कौतुकाची बाब आहे.”