fbpx
Thursday, April 25, 2024
ENTERTAINMENT

सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांचे रिया चक्रवर्ती वर गंभीर आरोप

रियाने सुशांतकडून उकळले करोडो रुपये, क्रेडीट कार्ड, कॅश, दागिने केले होते लंपास

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हीच्या विरोधात सुशांतचे वडील के के सिंह यांनी पाटणातील राजीव नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रिया व तिच्या कुटुंबीयांनी सुशांतचा मानसिक छळ केला. त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले, असा गंभीर आरोप के के सिंह यांनी केला आहे. यामुळे गेल्या महिन्याभरापासून सुशांतच्या आत्महत्याप्रकरणी सुरू असलेल्या तपासाला वेगळी दिशा मिळाली आहे. भारतीय दंड विधान कलम ३४१, ३४२, ३८०, ४०६, ४२०, ३०६ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुशांतच्या वडीलांनी आरोपपत्रात मुंबई पोलीस करत असलेल्या तपासावर अविश्वास व्यक्त केला आहे. यामुळेच या प्रकरणाचा तपास पाटणा पोलिसांनी करावा अशी विनंती सिंह यांनी केली आहे. तसेच सुशांत मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांवरही सिंह यांनी गंभीर आरोप केले आहेत. सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार रियाने, सुशांतची फसवणूक केली. त्याच्याकडून करोडो रुपये उकळले. तसेच त्याला कुटुंबापासूनही दूर राहण्यासाठी दबाव टाकला होता. यात रियाचे नातेवाईकही सामील होते, असेही सिंह यांनी तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यानच्या काळात रियाचे नातेवाईक इंद्रजीत चक्रवर्ती, संध्‍या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती यांनी सुशांतबरोबर जवळीक वाढवली होती. ते सुशांतच्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करत होते. सुशांत आधी ज्या घरात राहात होता. त्या घरात भूत असल्याचे सांगत त्यांनी त्याला ते घर सोडावयास भाग पाडले. यामुळे सुशांतची मानसिक अवस्था बिघडली.
तो मुंबई विमानतळाजवळील रिसोर्टमध्ये राहू लागला. त्यानंतर रिया सतत त्याला तुझे मानसिक आरोग्य ढासळले असल्याचे बोलू लागली. तुझ्या डोक्यावर परिणाम झाला असून चांगल्या डॉक्टरची तुला गरज असल्याचे तिने त्याला सांगितले. याबद्दल कळताच माझी मुलगी सुशांतला भेटली व तिने त्याला घरी पाटण्याला आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, रिया व तिच्या कुटुंबियांनी सुशांतला मुंबईतच राहण्यासाठी दबाव आणला. येथे त्याच्यावर उपचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे माझी मुलगी पाटण्याला एकटीच परतली, असे सिंह यांनी तक्रारीत म्हटले आहे.

रिया सुशांतला द्यायची औषधांचा ओव्हरडोस

रियाने उपचाराच्या बहाण्याने सुशांतला स्वत:च्या घरी नेले होते. तिथे तिने त्याला औषधांचा ओव्हरडोस दिला. त्यानंतर तिने सुशांतला डेंग्यू झाल्याचे सर्वांना सांगितले. पण प्रत्यक्षात सुशांतला कधीच डेंग्यू झाला नव्हता. यादरम्यान रियाने हळूहळू सुशांतच्या सर्व मालमत्तेवर कब्जा करण्यास सुरुवात केल्याचे सिंह यांनी तक्रारीत म्हटले आहे.

तसेच सिंह यांच्या म्हणण्यानुसार ज्यावेळी सुशांतला एखाद्या चित्रपटाची ऑफर यायची त्यावेळी रिया त्याच्यासमोर अट ठेवायची. जर त्या चित्रपटात सुशांतबरोबर तिलाही मुख्य भूमिका मिळणार असेल तरच तो चित्रपट करणार, असे ती निर्मात्यांना सांगत असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे. तसेच सुशांतच्या सर्व विश्वासू नोकरांनाही रियाने कामावरून काढून टाकले. त्यांच्याजागी स्वतःच्या ओळखीच्या लोकांना तिने कामावर ठेवले होते. रियाने सुशांतचा मोबाईल क्रमांकही बदलला होता. जेणेकरून तो त्याच्या व इतरांच्या संपर्कात राहणार नाही. यामुळे सुशांतबोरबर रोज बोलणे होत नसल्याचे सिंह यांनी तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यानच्या काळात सुशांतबरोबर बोलणे झाले असता त्याने रिया व तिचे कुटुंबिय आपल्याला मनोरुग्ण रुग्णालयात भरती करण्यच्या तयारीत असून मी काहीही करू शकत नसल्याचे सुशांतने मला सांगितले होते, असे सिंह यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर सुशांत बहिणींना भेटण्यासाठी दिल्लीला आला. पण त्याला येऊन तीनच दिवस झालेले असताना रियाने मात्र
त्याला सतत फोन करून हैराण केले व ताबडतोब परत येण्यास सांगितले.

तसेच सिंह यांनी असेही म्हटले आहे की माझा मुलगा चित्रपटक्षेत्र सोडून केरळमध्ये ऑर्गेनिक शेती करणार होता. पण रियाने यास तीव्र विरोध केला. तु कुठेही जाणार नाहीस आणि जर माझं ऐकलं नाहीस तर तूला वेड लागलयं असं मी सगळ्यांना आणि मीडियाला सांगेन. तुझा मेडीकल रिपोर्ट जाहीर करेन अशी धमकी तिने सुशांतला दिल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे. दरम्यान जेव्हा सुशांत आपलं ऐकत नसल्याचं आणि तिच्या बँक अकाऊंटमधली रक्कमही कमी होत असल्याचं तिच्या लक्षात आलं त्यावेळी रियाने ८ जून २०२० रोजी सुशांतच्या घरातून रोख रक्कम, दागिने, त्याचे क्रेडीट कार्ड, लॅपटॉप आणि महत्वाची कागदपत्रे लंपास केली. त्याचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला, असेही सिंह यांनी तक्रारीत म्हटले आहे.

तसेच त्यानंतर सुशांतने बहिणीला फोन केला तो घाबरलेला होता. रिया आपल्याला भलत्या प्रकरणात अडकवेल ती घरातून सामान घेऊन गेली आहे, अशी भीती त्याने व्यक्त केली. तसेच ८ जून रोजी सुशांतची सेक्रेटरी दिशा हिने आत्महत्या केली. तिला रियानेच आणले होते. यामुळे सुशांत घाबरल्याचे सिंह यांनी तक्रारीत म्हटले आहे.

तसेच गेल्या वर्षी त्याच्या बँक अकाऊंटमध्ये १७ करोड रुपये होते. त्यातील १५ करोड अचानक एका अनोळखी क्रमांकावर ट्रान्सफर झाल्याचेही सिंह यांनी तक्रारीत सांगितले आहे. तसेच या आरोपांबरोबरच अनेक प्रश्न सिंह यांनी उपस्थित केले असून या प्रकरणाचा तातडीने तपास करण्याची विनंती पाटणा पोलिसांना केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading