Saturday, June 20, 2026
PUNE

डॉ.रा.चिं. ढेरे भारतातील महत्त्वाचे संशोधन विद्यापीठ -प्रा. मिलिंद जोशी

पुणे, दि. २१- प्राचीन साहित्याचे गाढे अभ्यासक, प्रतिभाशाली संशोधक, व्रतस्थ वृत्तीचे ज्ञानोपासक, लोकसंस्कृतीचे मीमांसक असणारे डॉ. रा. चिं. ढेरे हे स्वत:च भारतातले एक महत्त्वाचे संशोधन विद्यापीठ होते. साठ वर्षे कोणत्याही वेतन आयोगाशिवाय, अनुदानाशिवाय, मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांशिवाय हे ढेरे नावाचे विद्यापीठ अव्याहतपणे आणि अखंडितपणे संशोधनाचे काम करून महाराष्ट्राची सांस्कृतिक श्रीमंती वाढवीत होते. एखाद्या पारंपरिक अथवा अभिमत विद्यापीठाला हेवा वाटावा असे काम डॉ ढेरे यांनी एकट्याने करून ठेवले आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.

ज्येष्ठ संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त प्रा. मिलिंद जोशी यांच्या कथा त्यांच्या सर्जनाची या विशेष व्याख्यानाचे आॅनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. देवमाणूस : डॉ रा चिं ढेरे हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, प्राचीन आणि मध्ययुगीन मराठी संस्कृती आणि साहित्य डॉ ढेरेंच्या संशोधनाच्या केंद्रस्थानी आहे. आपल्या संशोधनप्रक्रियेत त्यांनी अभिजनांच्या संस्कृतीपेक्षा बहुजनांच्या संस्कृतीला अधिक महत्त्व दिले. त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने लोकतत्त्वीय दृष्टीचा अवलंब केला. आपल्या संशोधनप्रवासात त्यांनी परंपरेचा आदर केलाच, त्याचबरोबर अनेक नव्या वाटाही चोखाळल्या. आधुनिक संशोधनपद्धतीचे अवलंबन करतानाच तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र, समाजशास्त्र, भाषाशास्त्र, मानसशास्त्र, मानववंशशास्त्र आणि स्थलशास्त्र या साºया ज्ञानशाखांचा आधार घेतला. डॉ ढेरे केवळ संशोधन करून थांबले नाहीत, तर पुढच्या अनेक पिढ्यांसाठी त्यांनी अनेक संशोधनविषय निर्माण करून ठेवले आहेत.
त्यांच्या संशोधनाचा व्याप आणि परीघ अणूपासोनि ब्रह्मांडा एवढा होत जातसे या समर्थ वचनाची आठवण यावी इतका मोठा आहे संशोधनातून गवसलेले सत्य त्यांनी निर्भयपणे सांगितले. शंभराहून अधिक संशोधनग्रंथ सिद्ध करून त्यांनी मराठी साहित्यशारदेचा संशोधनदरबार समृद्ध केला.

संशोधनाची वाट चोखाळताना त्यांनी पूर्वसुरींना कधीही निकालात काढले नाही. इतिहासाचार्य राजवाडे, सारस्वतकार भावे, वासुदेवशास्त्री खरे, ना. गो चापेकर आणि रावबहादूर पारसनीस यांच्या संशोधनातल्या चुका निदर्शनाला जरूर आणून दिल्या; पण त्यांचे काम नव्याने विस्तारताना त्यांच्या योगदानाचेही महत्त्व अधोरेखित केले आणि त्यांच्या ऋणाचीही आठवण ठेवली. डॉ ढेरेंनी संतसाहित्याचेही अनेक अंगांनी पुनर्मूल्यांकन केले.
मराठी साहित्यातल्या अनेक अलक्षित आणि अज्ञात ग्रंथकारांचे त्यांनी संशोधनपूर्वक नवदर्शन घडविले. लोकसाहित्याच्या अभ्यासाला त्यांनी नवी अध्ययनदृष्टी तर दिलीच व त्याचबरोबर लोकसाहित्य समीक्षेची पायाभरणी करून तिला परिभाषाही दिली. महाराष्ट्र संस्कृतीचे भारतीय संदर्भाच्या व्यापक पटलावर अवलोकन करताना डॉ ढेरेंनी संशोधनाला समग्रतेचे भान दिले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading