मागासवर्गीय विद्यार्थी अनुदाना पासून वंचित, निधी अन्य ठिकणी वळविला – राजेंद्र पातोडे
मुंबई दि. १८ – ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील बाहेरगावी शिकणारे विद्यार्थी वसतिगृहात प्रवेश न मिळाल्याने स्वखर्चाने शिकत होते. राज्य सरकारच्या स्वाधार योजने करीता पात्र असलेल्या या लाखो विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष संपून देखील त्यांचे हक्काचे अनुदान मिळाले नाही. सामाजिक न्यायाच्या गप्पा हाकणा-या आघाडी सरकारने अनुसूचित जातीचा अर्थसंकल्पातील राखीव निधी इतर योजनेवर वळता केला आहे. त्यामुळे अनुसूचित जाती जमाती बद्दल या सरकारचा असलेला दूषित दृष्टीकोन उघड झाला आहे. स्वाधार अनुदानापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांचे अनुदान देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाला रस्त्यावर उद्रेक होण्याची अपेक्षा आहे का ? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी उपस्थित केला आहे.
इयत्ता अकरावी, बारावी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये तसेच वैद्यकिय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थी ज्यांना कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ देण्याची योजना आहे. भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना ही योजना लागू नाही. या योजनेसाठी गुणवत्तेनुसार पात्र ठरणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना अनुदान देण्यासाठी मागील वर्षी समाज कल्याण विभागाच्या वतीने सर्व सोपस्कार पार पाडण्यात आले आहेत. ६० टक्के पेक्षा जास्त गुण असलेल्या या विद्यार्थ्यांनी स्वखर्चातून भोजन, घरभाडे आणि इतर शैक्षणिक सुविधांकरिता येणारा खर्च स्वतः केला आहे.
विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न हे अत्यल्प असल्याने अनेक तडजोडी करून अनेकांनी ही रक्कम उभी केली होती. बाहेर गावी राहून शिक्षण पूर्ण करणा-या या विद्यार्थ्यांना वेळेत स्वाधारचे अनुदान मिळणे गरजेचे होते. विशेष म्हणजे या मध्ये या प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. राष्ट्रवादीच्या अखत्यारीत समाज कल्याण विभाग व अर्थ खाते आहे. दरवेळी प्रमाणे या वेळी देखील राष्ट्रवादीने अनुसूचित जाती व नवबौद्ध यांच्यावरील आकसापोटी अर्थसंकल्पातील अनुसूचित जातीचा निधी अन्य योजनेवर वळता केला आहे. तरीही सामाजिक न्याय मंत्री मूग गिळून गप्प बसले आहेत. आघाडी सरकारच्या या अन्यायी धोरणामुळे आंबेडकरी समूहात प्रचंड संतापाची लाट आली आहे. याचा उद्रेक होण्याआधी सरकारने स्वाधार योजनेचा निधी तातडीने विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावा,अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडीने व्यक्त केली आहे.अन्यथा सामाजिक न्याय मंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा देखील दिला आहे.