फोर्टमधील इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख; जखमींना ५० हजारांची रुपयांची मदत
मुंबई, दि. १७ : मुंबईतील फोर्ट भागातील भानुशाली इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ४ लाख व जखमींना ५० हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी शुक्रवारी केली. तसेच गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा करुन इमारतीचे काम पूर्ण होईपर्यंत रहिवाशांची निवाऱ्याची व्यवस्था सरकारच्या वतीने करण्याची ग्वाही श्री. शेख यांनी दिली.

काल फोर्ट भागातील सहा मजली भानुशाली बिल्डिंगचा उत्तरेकडील भाग कोसळून त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले आहेत. अग्निशामक दल व महानगरपालिकेच्या वतीने अद्याप शोध मोहिम सुरू आहे. दुर्घटनेबाबत माहिती मिळताच मुंबईचे पालकमंत्री श्री. अस्लम शेख यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुर्घटनाग्रस्तांना संपूर्ण मदत करण्याच्या सूचना प्रशासनास केल्या.
घटना समजताच अग्निशमन दल, महापालिका कामगार, पोलीस यांच्यासह स्थानिक नागरीकांच्या मदतीने दुर्घटनाग्रस्त ठिकाणी तातडीने मदतीचे काम सुरु करण्यात आले. ढिगारा उपसण्याचे काम गुरुवारी रात्री उशीरापर्यंत सुरु होते. दुर्घटनाग्रस्तांना चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेत. तसेच त्यांच्यासाठी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात यावी अशा सूचना श्री. शेख प्रशासनाला दिल्या.
मुख्यमंत्री सहायता निधीमधून मृतांच्या कुटुंबियांना अतिरिक्त मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याबाबत जिल्हा प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत.
Share this:
- Share on X (Opens in new window) X
- Share on Facebook (Opens in new window) Facebook
- Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Share on Telegram (Opens in new window) Telegram
- Share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Share on Pinterest (Opens in new window) Pinterest
- Email a link to a friend (Opens in new window) Email
- Print (Opens in new window) Print
