या विकेंडला रंगणार “मधुरव”चा सांगता सोहळा
१७ एप्रिल २०२० पासून ‘मधुरव’ ह्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. दर शुक्रवार आणि रविवार संध्याकाळी ६ वाजता ‘मधुरा अभिजीत वेलणकर साटम’ या फेसबुक अकाउंट वरून हा कार्यक्रम सादर केला गेला. ह्याचे आजपर्यंत १७ भाग पूर्ण झाले आहेत. १८-१९-२० हे भाग शुक्रवार-शनिवार-रविवार म्हणजे “१९-२० आणि २१ जूनला संध्याकाळी ६ वाजता सेम अकाउंट वरून सादर होतील. ह्या तीन दिवसांच्या कार्यक्रमाला “मधुरव सांगता सोहळा” किंवा “मधुरव फिनाले फेस्टिवल” असं संबोधलं आहे.

जगभरातून उदंड प्रतिसाद मिळाल्याने ह्याचा सीजन-२ करण्याचा मानस आहे परंतु आत्ता “मधुरव- सीजन १” ची समाप्ती या सांगता सोहळ्याने होईल.
प्रत्येक भागात ३ ते ४ जणांचे विविध स्वरूपातील लिखाणचे वाचन मधुरा वेलणकर स्वतः करत असे आणि ज्यांचे लिखाण आहे त्यांना ऑनलाईन प्रेक्षकांसमोर आणून त्यांच्याशी संवाद साधून त्यांचं कौतुक करत असे व प्रेक्षकांच्या थेट प्रतिक्रिया वाचून दाखवत असे. तिच्या सोबतीला रोहित फाळके देखील कार्यक्रमाचा भाग होता व मनीष नेने यांनी तांत्रिक बाजू सांभाळली.
“स्वानंद किरकिरे”, “दिलीप प्रभावळकर”, “मंगला गोडबोले” यांनी कार्यक्रमात येऊन मोलाचे मार्गदर्शन केले. “शुभांगी गोखले” व “मुग्धा गोडबोले” यांनी ‘मातृदिन-विशेष’ भागात लेखांचे वाचन केले.
आपण घरात सुखरूप होतो म्हणून हा कार्यक्रम करू शकलो. आपण व्यक्त होऊ शकलो, नवीन लिहू शकलो, समाजव्यवस्थेतील अनेक घटक अविरत काम करत होते म्हणूनच. ह्याच काही घटकातील प्रतिनिधी या ‘मधूरव सांगता सोहळ्यात’ उपस्थित राहणार आहेत. या खास पाहुण्यांशी संवाद साधणार आहोत, अनुभव ऐकणार आहोत आणि कार्यक्रमाच्या तत्त्वानुसार लिखाणातून ‘त्यांचं कौतुक’ करणार आहोत. विविध क्षेत्रातील पण लिखाणातून व्यक्त होणारी मंडळी त्यांना व्यासपीठ मिळावं त्यांचं कौतुक व्हावं म्हणून हा कार्यक्रम सुरू केला. हे कौतुक पूर्णत्वाला नेण्यासाठी सीजन -१ मधील वाचन झालेल्या लिखाणाचा दिवाळी अंक प्रकाशित केला जाणार आहे. (हार्ड कॉपी आणि ऑनलाईन मॅक्झिन).
या कार्यक्रमाला अतिशय ‘सन्माननीय’ पाहुणे लाभले आहेत.
शुक्रवार १९ जून २०२०
संध्याकाळी ६ वाजता —
“नियती ठाकर” डी सी पी
शनिवार २० जून २०२० संध्याकाळी ६ वाजता
विजय बालमवार – डी एम सी
साहिल जोशी – Executive Producer
रविवार २१ जून २०२० संध्याकाळी सहा वाजता — सलील बेंद्रे” – प्रोफेसर-डॉक्टर
रविवारच्या शेवटच्या भागाच्या अखेरीस एकंदरीत ‘मधुरव’ या कार्यक्रमाविषयी व लेखन- साहित्य- कविता ह्यांविषयी संवाद साधण्यासाठी सुप्रसिद्ध कवी- “संदीप खरे” सहभागी होतील व त्यांच्या काव्य रचनेने या मधुरव सीजन-१ ची सांगता होईल.